भेसळयुक्त पनीरपाठाेपाठ बाजारातून ‘शुद्ध तूप’ गायब:गरेदार, पिवळेधम्मक, विनालेबल बरण्यांतून हाेत असे विक्री

बाजारातून पनीर गायब झाल्यानंतर आता ‘शुद्ध’ म्हणून विकले जाणारे भेसळयुक्त तूपही अचानक गायब झाले आहे. कोणतीही नोंद किंवा लेबल नसलेल्या बरण्यांमधून होणारी ही धोकादायक विक्री अचानक थांबली आहे. यामुळे आतापर्यंत शुद्ध गरेदार तुपाच्या निमित्ताने आपण नेमके कोणते विष खात होतो? असा प्रश्न जनतेला पडला आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारताच भेसळखोरांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मुंडे यांच्या धडक मोहिमेची धास्ती घेत नाशिकसह राज्यभरातील भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. बाजारात विविध ब्रॅण्डस‌्चे शुद्ध तूप 600 ते 650 रुपये किलो दराने उपलब्ध असताना, त्याच किमतीच्या तुलनेत 450 रुपये किलो दराने भेसळयुक्त शुद्ध तूप सहज उपलब्ध होत होते. पाम तेल आणि सोयाबीन तेलाचे मिश्रण करून त्याला पिवळा रंग टाकून तयार केलेले हे ‘कृत्रिम तूप’ ग्राहकांच्या आरोग्याशी अक्षरश: खेळ करत होते. अनेक ठिकाणी ही उत्पादने बिनधास्तपणे तयार केली जात होती. मात्र, राज्यभरात भेसळखोरांवर धाडी पडून गुन्हे दाखल होऊ लागल्यानंतर हे उत्पादन अड्डे बंद होत असून, दुकानांमध्ये गरेदार, पिवळेधम्मक शुद्ध तुपांच्या सजलेल्या बरण्या, प्लास्टिक जार गायब झाल्याचे दिसून येत आहे. एफडीएकडे करा तक्रार प्रशासनाच्या या कारवाईमुळे जरी भेसळयुक्त तूप बाजारातून गायब झाले असले, तरी ग्राहकांनी खरेदी करताना सतर्क राहणे गरजेचे आहे. ज्या बरण्यांवर ब्रँडचे नाव, पॅकिंगची तारीख आणि अन्न सुरक्षा परवाना क्रमांक नाही, अशा उत्पादनांची खरेदी टाळावी. तसेच, संशयास्पद वस्तू आढळल्यास तत्काळ अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करावी. -परेश बोधाणी, खाद्यतेल ब्रोकर अशी होती भेसळयुक्त तुपाची ‘प्रयोगशाळा’ पाम तेल (स्वस्त आणि घट्ट होणारे) आणि सोयाबीन तेलाचे मिश्रण करून त्यात तुपासारखा दिसणारा पिवळा रंग मिसळला जात असे. तुपाचा सुगंध येण्यासाठी यात घातक रसायने किंवा इसेंस मिसळले जातात. लेबल नसलेल्या बरण्या ज्यावर कोणत्याही कंपनीचे नाव, एफडीए परवाना क्रमांक किंवा एक्सपायरी डेट नसायची. त्यामुळे कारवाई टाळणे सोपे होते. थेट स्थानिक किराणा दुकाने आणि टपरीवजा दुकानांमध्ये स्वस्त दरात या तुपाचा पुरवठा केला जातो, ज्यामुळे ग्राहक आकर्षित होतात.

Leave a Comment

error: Content is protected !!