तुम्ही लोकांचे जय श्रीराम करायचे ठरवले आहे का?:भास्कर जाधवांची कोपरखळी; फरांदेंचा वेगळाच आग्रह, अखेर अध्यक्षांचा हस्तक्षेप

विधानसभेत आज एक वेगळाच प्रसंग घडला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी मनरेगाच्या मुद्यावर बोलताना सरकारला धारेवर धरले. त्यात त्यांनी सरकारला तुम्ही लोकांचे जय श्रीराम करायचे ठरवले आहे का? अशी मिश्कील कोपरखळी मारली. त्यावर भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी त्यांच्याकडे जय श्रीराम बोलण्याचा आग्रह धरला. यामुळे सभागृहात काही वेळ चांगलाच तणाव निर्माण झाला. त्याचे झाले असे की, आमदार भास्कर जाधव यांनी आज सभागृहाच्या कामाजाला सुरूवात झाल्यानंतर मनरेगा योजनेतील मजुरांच्या थकीत पगारावरून सरकारला धारेवर धरले. मनरेगाच्या मजुरांचे पैसे 4-4 वर्षे का रोखले जातात? तुम्ही लोकांचे जय श्रीराम करायचे ठरवले आहे काय? असा खडा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला. त्यांचे हे विधान ऐकताच मागच्या बाकावर बसलेल्या भाजप आमदार देवयानी फरांदे तत्काळ पहिल्या बाकावर येऊन बसल्या. त्यांनी भास्कर जाधव यांच्या भाषणात व्यत्यय निर्माण करत त्यांना जय श्रीराम बोलण्याचा आग्रह धरला. पहिल्या रांगेत बसल्याने पहिल्या रांगेचे अधिकार मिळत नाहीत – नार्वेकर यावेळी भास्कर जाधव यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतरही त्यांनी आपले म्हणणे पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. जाधवांच्या भाषणात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अखेर जाधवांनी संरक्षण मागितल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फरांदे यांना चांगलेच खडेबोल सुनावले. देवयानी फरांदे ताई, तुम्ही जागेवर जाऊन बसा. तुम्ही पहिल्या रांगेत येऊन बसलात म्हणजे तुम्हाला पहिल्या रांगेचे अधिकार मिळालेले नाहीत. तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसा, असे ते म्हणाले. मॅडम, तुमच्याकडून शिक्षण घेण्याची माझी प्रज्ञा नाही – जाधव विधानसभा अध्यक्षांनी आमदार फरांदे यांना फटकारल्यानंतर भास्कर जाधव यांनीही त्यांना जोरदार टोला हाणला. मॅडम, तुमच्याकडून शिक्षण घेण्याची माझी प्रज्ञा नाही. तुमची विद्वत्ता एवढी मोठी आहे की, ती मला परवडणारी नाही, असे ते म्हणाले. त्यानंतर मजुरांच्या प्रश्नावर सरकार समाधानकारक उत्तर देत नसल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी सरकारचा निषेध करत सभात्याग केला. सरकार मजुरांच्या कल्याणासाठी कटिबद्ध या गदारोळातच संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी सरकार मजुरांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. केंद्र सरकारकडून या योजनेसाठी निधी प्राप्त झाला आहे. आता एका महिन्याच्या आत सर्व मजुरांची देणी दिली जातील. सरकार मजुरांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. विरोधक या प्रकरणी केवळ राजकारण करत आहेत, असे ते म्हणाले.

Leave a Comment

error: Content is protected !!