Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

हा तोच महाराष्ट्र आहे का?:अशोक खरात प्रकरणावरून अंबादास दानवेंनी व्यक्त केल्या भावना, नेमके काय म्हणाले?

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार या खरातने केले असल्याचे समोर आले आहे. तसेच रुपाली चाकणकर यांचे अनेक फोटो व्हिडिओ अशोक खरातसोबत असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांना राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. या भोंदुगिरीच्या प्रकरणांवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले विचार मांडले आहेत. अंबादास दानवे यांनी ट्विट करत महाराष्ट्रातील राजकीय नेतृत्व तसेच समाजधुरिण यांना उद्देशून म्हटले की, महाराष्ट्र हे देशातील एक अत्यंत पुरोगामी, विचारी आणि स्वाभिमानी प्रवृत्ती जपणारे राज्य आहे. स्वातंत्र्योत्तर काळात आदरणीय यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या उत्तुंग नेतृत्वाने या मातीला विचारांचे खतपाणी घातले. या महान नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात कधीही अंधभक्तीला, बुवाबाजीला किंवा ढोंगीपणाला थारा दिला नाही. उलट, त्यांनी सामान्यांमध्ये तार्किक विचार आणि प्रखर वैज्ञानिक दृष्टिकोनाची पेरणी केली. एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष प्रहार पुढे अंबादास दानवे म्हणाले, आज मात्र राज्याची सद्यस्थिती आणि विशेषतः नाशिकमधील कॅप्टन अशोक खरात यांसारखी प्रकरणे पाहिल्यावर मनात दाटून येणारा प्रश्न हाच आहे की, हा खरोखर तोच महाराष्ट्र आहे का? जिथे हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेबांसारखा अंधश्रद्धा मुळापासून उपटून टाकणारा आणि थोतांडावर आसूड ओढणारा क्रांतीकारी नेता जन्माला आला, त्याच नेत्याचे भक्त म्हणवणारे आज सत्ता आणि स्वार्थासाठी खरात सारख्या भोंदू प्रवृत्तींची संगत आवडीने पसंत करत आहेत? ज्या प्रवृत्तींवर शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यभर प्रहार केले, आज त्याच प्रवृत्तींच्या मांडीला मांडी लावून माननीय बाळासाहेबांचा वारसा सांगणारे बसलेले पाहून मनात या ढोंगीपणाची चीड उत्पन्न होते, असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर प्रहार केला आहे. तुमचे ‘आक्रोश मोर्चे’ कुठे गेले? पुढे अंबादास दानवे म्हणाले, नाशिकमधील या तथाकथित ‘कॅप्टन’ने ज्या प्रकारे जनता, बायकांची फसवणूक केली आणि त्याला ज्या पद्धतीचे राजकीय अभय मिळत गेले, ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारे आहे. भाजपचे सो कॉल्ड मोर्चा फेम नितेश राणे, महेश लांडगे यांसारखे नेते जे दरवेळी हिंदुत्वाचा आव आणून गळे काढत असतात, त्यांना आज माझा एक सवाल आहे— आता तुमचे ‘आक्रोश मोर्चे’ कुठे गेले? अशोक खरातच्या या भोंदूपणामुळे ज्या शेकडो महिलांची फसवणूक झाली, ज्यांना मानसिक आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागले, त्या पीडित महिलाही हिंदूच आहेत ना? मग आज तुमचा हिंदुत्वाचा कैवार कुठे हरवला आहे? राजकीय सोयीसाठी हिंदुत्वाचा वापर करणाऱ्यांना या भगिनींचे अश्रू का दिसत नाहीत? असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला. अशा प्रवृत्तींना थारा देऊन अधोगतीचा धडा गिरवायचा का? माझ्या आईने मला नेहमीच एक गोष्ट शिकवली आहे, ती म्हणजे स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवणे. ते मी पाळतो आणि पाळत राहणार. महाराष्ट्र हा कायम देशाला राजकारण आणि समाजकारणात दिशा देणारा अग्रगण्य प्रांत ठरला आहे. राजकारणाची झालेली अभूतपूर्व वाताहत अख्ख्या देशाने पाहिलीच आहे, पण आता समाजकारणातही आपण अशा प्रवृत्तींना थारा देऊन अधोगतीचा धडा गिरवायचा का? हे एकदा स्वतःच्या सदसद्विवेकबुद्धीला नक्की विचारून पहा, असे आवाहनही अंबादास दानवे यांनी केले आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!