महाराष्ट्रात सध्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुपारी पक्षाच्या सर्व खासदारांची तातडीने बैठक बोलवल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तसेच पक्षांतर्गत नाराजी असल्याचे देखील बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री व शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे दिल्लीच्या दौऱ्यावर गेले होते, तेव्हापासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली होती. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली असल्याचे समजते. दिल्लीत खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या ठाकरे गटाच्या खासदारांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत अंतर्गत नाराजी उफाळून आल्याची माहिती मिळत असून, यावेळी खासदारांनी थेट वरिष्ठ नेत्यांसमोर आपल्या तक्रारींचा पाढा वाचला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे खासदारांना पुरेसा वेळ देत नाहीत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाकडून अपेक्षित असलेले पाठबळ किंवा मदत मिळाली नाही, अशा शब्दांत खासदारांनी आपली उघड नाराजी व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. संजय राऊत यांच्या बैठकीत खासदारांनी नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे समजते. जर उद्धव ठाकरेंना प्रकृती किंवा इतर कारणांमुळे काही मर्यादा असतील, तर आदित्य ठाकरे संपूर्ण महाराष्ट्र का फिरत नाहीत? असा सवालही खासदारांनी विचारला होता. खासदारांच्या या आक्रमक भूमिकेनंतर आज उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे. आता या बैठकीतून सध्यातरी सर्व काही आलबेल असल्याचे सांगण्यात येत आहे.
