सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवरून आज विधानसभेत जोरदार गदारोळ पाहायला मिळाला, जिथे भाजपने संख्याबळ नसतानाही प्रशासकीय बळाचा वापर करून आपला अध्यक्ष निवडून आणल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी केला. या निवडीसाठी पोलिस अधीक्षकांनी मदत केल्याचा ठपका ठेवत शिवसेना मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात आक्रमक पवित्रा घेतला. याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सत्ताधारी मंत्र्यांना चांगलेच डिवचले. भाजप तुम्हाला चिरडत आहे आणि तुमचे मंत्री मार खात असूनही साधे भाजपचे नाव घ्यायलाही घाबरत आहेत, अशा शब्दांत टोलेबाजी करत परब यांनी साताऱ्यातील वादावरून सभागृहात सत्ताधाऱ्यांची कोंडी केली. अनिल परब म्हणाले, उपसभापती यांनी सकाळी एसपीला निलंबित केले. काही दिवसांपूर्वी खालच्या सभागृहात तालिका अध्यक्ष यांनी एका अधिकाऱ्याला निलंबित केले. पुन्हा त्याला पदावर घेण्यात आले आहे. आता, उपसभापती यांनी निलंबन केले. आता, त्यांच्यावर अविश्वास ठराव आणणार आहात का? कल्याणमध्ये तत्कालीन एसपी परमबीरसिंहने त्रास दिला म्हणून यांच्या मंत्र्याने व्यासपीठावर राजीनामा दिला होता. आता कुठे गेले ते वाघ? असा सवाल परब यांनी उपस्थित केला. मार खाण्यापेक्षा मारा सत्तेला लाथ पुढे बोलताना अनिल परब म्हणाले, मार खाण्यापेक्षा मारा सत्तेला लाथ आणि पडा ना बाहेर. पण, तुम्हाला भाजपचे नाव सुद्धा घ्यायला घाबरायला होत आहे. सातारामध्ये दोन राजांना मारले, दोन राजे मार खातात, साक्षात शंभुराजे देसाई यांना मारले आहे, असे म्हणत परब यांनी भाजप विरुद्ध शिवसेना या वादात ठिणगी पेटवण्याचे काम केले आहे. तसेच महाराष्ट्रात सगळे प्रश्न संपले आहेत आणि समोर काय येत आहे. मंत्री मार खातोय, भोंदू बाबा मोठ्या लोकांना फसवतोय, लैंगिक अत्याचार करतो आणि तुम्ही काहीच करत नाही. महाराष्ट्राच्या या एपस्टिन फाइलबाबत सरकारचे काय धोरण आहे हे स्पष्ट व्हायला पाहिजे, अशी मागणी अनिल परब यांनी केली. आम्ही हतबल नाही- शंभूराज देसाई दरम्यान, अनिल परब यांच्या भाषणाला प्रत्युत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, सातारामध्ये जो प्रकार घडला तो आपल्याला निदर्शनास आणून द्यायचा होता. परब म्हणाले की, आम्ही उठाव केला. पण, त्यावेळी त्यांचे प्रेते येतील, कोथळा बाहेर काढू असे म्हटले जात होते. परंतु काय झाले, आम्ही पुन्हा आलो, सन्मानाने आलो. काय केले यांनी? आम्हाला आता डिवचू नका. आता आम्ही सत्तेत आलो आणि कालसारखे काही कटू अनुभव देखील आले आहेत. याचा अर्थ आम्ही हतबल आहोत असा अर्थ काढू नये, असे देसाई म्हणाले.
