सध्या वाढत्या उष्णतेमुळे वन्य प्राण्यांची तहान भागविण्यासाठी वन विभागाने तातडीने पाणवठे पाण्यांनी भरण्यास सुरुवात केली असून त्यामुळे जिल्हयात सुमारे २ हजार पेक्षा अधिक वन्य प्राण्यांची तहान भागवली जाऊ लागली आहे. जिल्ह्यातील १९ पाणवठ्यांमधून दररोज पाणी भरले जात आहे. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोलीसह औंढा नागनाथ, सेनगाव, कळमनुरी, वसमत तालुक्यात वन्य प्राण्यांची संख्या सुमारे २ हजार पेक्षा अधिक आहे. यामध्ये प्रामुख्याने रोही, हरीण, काळवीट, माकड, रानडुक्कर या प्राण्यांचा समावेश असून इतर लहानमोठे प्राणी देखील जंगलांमधून आहेत. सध्या उन्हाळा वाढू लागला असून त्यामुळे तहानलेले वन्य प्राणी गावात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वन्य प्राण्यांना जंगलामध्येच पिण्याची पाणी मिळावे यासाठी वन विभागाने १९ ठिकाणी पाणवठे तयार केले आहेत. या पाणवठ्यांची विभागीय वन अधिकारी डॉ. राजेंद्र नाळे, सहाय्यक विभागीय वन अधिकारी सचिन माने, वन परिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार यांच्या पथकाने सर्वच ठिकाणी पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी पाणवठ्यांची दुरुस्ती केली आहे. दरम्यान, या पाणवठ्यांमधून आता ट्रॅक्टरच्या सहाय्याने पाणी भरले जात आहे. या पाणवठ्यांमुळे वन्य प्राण्यांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध झाल्यामुळे सकाळी व सायंकाळच्या वेळी वन्य प्राणी या ठिकाणी पाणी पिण्यासाठी येऊ लागले आहेत. त्यामुळे या पाणवठ्यांसाठी दररोज किमान आठ ते दहा ट्रॅक्टर पाणी लागत असल्याचे चित्र आहे. वन विभागाकडून दररोज पाहणी करून रिकामे झालेल्या पाणवठ्यामध्ये पाणी भरले जात असल्याने वन्य प्राण्यांची तहान भागत असल्याचे चित्र आहे.
