साखरपुड्यानंतर आपल्या शैक्षणिक कामासाठी एकेठिकाणी जाणाऱ्या नियोजित वधू – वराचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोलापूर – धुळे राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे. या घटनेमुळे या जोडप्याचे लग्नाचे स्वप्न अधुरे राहिले असून, यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, वाशी तालुक्यातील पारा येथील नामदेव शिनगारे यांचा मुलगा अक्षय शिनगारे (25) व इजोरा (हालमुक्काम वाशी) येथील सुनील चव्हाण यांची मुलगी अक्षया चव्हाण (23) यांचा गत रविवारी (15 फेब्रुवारी) साखरपुडा झाला होता. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांत त्यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. त्यातच नववधू अक्षया हिची आज रविवारी लातूर येथे महापारेशनची परीक्षा होती. वधूच्या परीक्षेसाठी लातूरला जाताना अपघात या परीक्षेसाठी अक्षय व अक्षया हे कारने पहाटे वाशी येथून लातूरच्या दिशेने निगाले होते. सकाळी 6 च्या सुमारास रत्नापूर पाटीजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व कार भरधाव वेगात थेट येडशी टोलवेच्या कमानीला धडकली. ही धडक एवढी भीषण होती की, कारचा पुढील भागाचा पूर्णतः चेंदामेंदा झाला. त्यात अक्षय व अक्षया या दोन्ही नियोजित वधू वराचा जागीच मृत्यू झाला. कारचालक गंभीर जखमी, उपचार सुरू या घटनेत चालक अक्षय सिरसाट (22) हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच रत्नापूर येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतील. त्यांनी जखमी चालकाला 108 रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी लगतच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पुढील सोपस्कारासाठी येरमाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. साखरपुड्यानंतर अवघ्या 4 दिवसांतच नियोजित वर-वधूचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण वाशी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
