Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

मुंबईच्या महापौर रितू तावडे ट्रोलर्सवर संतापल्या:म्हणाल्या – तुमच्या घरात आया-बहिणी आहेत की नाही? जिभेला काही हाड आहे की नाही?

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी जैनमुनी नम्रमुनी यांच्या चमत्कारामुळे आपली घशाची समस्या दूर झाल्याचा दावा केला आहे. भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांमुळे अवघ्या महाराष्ट्रात अंधश्रद्धेविरोधात संतापाची लाट उसळली असताना त्यांनी हे विधान केल्यामुळे त्यांना ट्रोल केले जात आहे. आता रितू तावडे यांनी तुमच्या जिभेला काही हाड आहे की नाही? असा प्रश्न करत ट्रोलर्सचा समाचार घेतला आहे. मुंबईच्या भाजप महापौर रितू तावडे यांनी मंगळवारी महावीर जयंतीच्या एका कार्यक्रमात बोलताना जैनमुनी नम्रमुनी यांच्या आशीर्वादामुळे आपला घसा बरा झाल्याचे वादग्रस्त विधान केले होते. दीड ते दोन वर्षांपासून मला घशाची समस्या होती. मी गुरुजींना सांगितले की आवाजाची समस्या आहे. मी औषधे घेत आहे. परंतु काहीही फरक पडत नाही. त्यानंतर त्यांनी मला आशीर्वाद दिला आज मी स्पष्टपणे बोलत आहे. हा मोठा चमत्कार आहे. आज माझा आवाज तुम्ही ऐकत आहात. खूपच सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळत आहे, असे रितू तावडे म्हणाल्या होत्या. संजय राऊतांसह अनेकांनी केली टीका रितू तावडे यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणी त्यांना खडेबोल सुनावले. त्यामुळे रितू तावडे यांनी आज एका पत्रकार परिषदेद्वारे त्यांचा खरपूस समाचार घेतला. त्या म्हणाल्या, ट्रोल करणाऱ्यांच्या जिभेला काही हाड आहे की नाही? तुमच्या घरात आया-बहिणी आहेत की नाही? मी सर्वांना सांगू इच्छिते की, मंगळवारी बोरीवली येथे नम्रमुनी महाराज यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात मुंबईतील डब्बेवाले व काही दिव्यांगांना ई-बाईक देण्यात आल्या. यावेळी प्राण्यांच्या एका रुग्णालयाचेही उद्घाटन करण्यात आले. यावेळी नम्रमुनी महाराज यांना मानणारे अनेकजण उपस्थित होते. त्यावेळी मी माझ्या मनात असणारा आदरभाव व्यक्त केला. राऊतांच्या जिभेला हाडच राहिले नाही मी म्हणाले होते की, मागील दीड वर्षांपासून मला घशाचा त्रास होत होता. त्यावर मी उपचारही घेतले होते. पण जेव्हा मी नम्रमुनी महाराजांना हे सांगितले, तेव्हा त्यांनी मला ओमचा उच्चार करण्यास सांगितला. आम्ही गुजरातला त्यांच्या आश्रमातही गेलो. तेव्हा त्यांनी आमच्याकडून ओमचा उच्चार करून घेतला. त्यानंतर मी त्याचा सराव केला. त्याचा परिणाम असा झाला की, माझा आवाज चांगला झाला. त्यानंतर कालच्या कार्यक्रमात मी तशी भावना व्यक्त केली. त्यात कुठेही अंधश्रद्धेला प्रोत्साहन मिळाले नाही. आम्ही स्वामी समर्थ, साईबाबा यांचे भक्त आहोत. आम्ही नम्रमुनी महाराजांनाही फॉलो करतो. पण यावरून मला ट्रोल करण्यात आले. मला या गोष्टीची किळस येते. तु्म्ही कुणालाही कुणाशीही जोडता? जे 27 व 20 पैसे घेऊन ट्रोल करतात, त्यांच्या घरात आया-बहिणी आहेत की नाही? तुम्ही कशा पद्धतीने ट्रोल करता? एखाद्या महिलेविषयी तुम्ही कोणत्या थराला जाऊन ट्रोलिंगची भाषा वापरता? जे उबाठाचे भोंगे आहेत त्या संजय राऊत यांच्या जिभेला तर काही हाडच राहिले नाही, असे रितू तावडे म्हणाल्या.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!