महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला:मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सहकार्याने ‘साकळाई’चे स्वप्न होणार पूर्ण, विखे पाटलांची माहिती

श्रीगोंदा व अहिल्यानगर या दोन तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाला वरदान ठरणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली आहे. यामुळे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या ३२ गावांतील १० हजार हेक्टर क्षेत्राला पाणी देण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यामातून पूर्ण होत असल्याचे समाधान आहे, अशी भावना राज्याचे जलसंपदा तथा पालक मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी व्यक्त केली. मंत्री विखे पाटील म्हणाले, लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांनी साकळाई योजनेचे स्वप्न पाहिले होते. त्यानंतर वेळोवेळी बैठका घेऊन, विविध आवश्यक परवानग्या व मान्यता प्राप्त करुन हे स्वप्न आज पूर्ण होत आहे. आता पुढील ४ वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार महायुती सरकारचा आहे. साकळाई उपसा सिंचन योजने अंतर्गत म्हसेगांव येथून ४ टप्प्यांमध्ये पाणी उचलून अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व अहिल्यानगर या दोन तालुक्यांतील एकूण ३२ गावांमध्ये विकेंद्रीत जलसाठ्यांद्वारे अस्तित्वातील ल. पा. तलाव, पाझर तलाव, सिमेंट नाला बंधारे व गाव तलावांमध्ये पाणी सोडण्याचे नियोजन आहे. या योजनेत सिंचनासाठी १.६० TMC व पिण्यासाठी ०.२० TMC असा एकूण १.८० TMC इतका पाणी वापर नियोजित आहे. साकळाई योजनेमध्ये घोड धरणाच्या जलाशयातून मौजे म्हसे येथे पंपगृह क्रमांक १ चे बांधकाम करण्यात येणार आहे. पंपगृह क्रमांक १ते४ व वितरण कुंड १,२ व 3 द्वारे एकूण ४टप्प्यांमध्ये सुमारे २०८.३४ मिटर उपसा करुन चिखली व घुटेवाडी येथील डोंगरावरील वितरण हौदामध्ये सोडण्यात येणार आहे. वितरण हौद क्रमांक 2 व 3 मधून गुरुत्वीय बंदीस्त नलिका प्रणालीद्वारे लाभ क्षेत्रातील ३२ गावांतील १९६ तलाव भरण्यासाठी पाणी सोडण्याचे नियोजन आहे. दुष्काळग्रस्त भागाला पाणी मिळावे म्हणून लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांनी अनेक वर्षे पाठपुरावा केला.राज्यात महायुती सरकार आल्यानंतर योजनेच्या सर्वेक्षणापासून ते योजनेच्या सर्व प्रस्तावांना मान्यता देण्याच्या सर्व निर्णयांचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असल्याचे स्पष्ट करून, मंत्री विखे पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत योजनेच्या संदर्भात जाणीपुर्वक राजकारण करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला. परंतु अंतिमतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दुष्काळग्रस्त भागातील जनतेला पाणी देण्याचा शब्द पूर्ण केला. साकळाई योजनेचे काम पूर्णत्वास जावे म्हणून डॉ. सुजय विखे पाटील यांची मोठी धडपड होती. प्रशासकीय स्तरावर त्यांचाही पाठपुरावा सात्तत्याने सुरू होता. मंत्रिमंडळाने साकळाई योजनेला दिलेल्या मान्यतेबद्दल डॉ सुजय विखे पाटील यांनी आनंद व्यक्त केला असून, महायुती सरकारच्या सहकार्याने दुष्काळग्रस्त भागातील जनतेला न्याय मिळत असल्याचे समाधान भाजपाचे राज्याचे उपाध्यक्ष डॉक्टर विखे पाटील यांनी व्यक्त केले.

Leave a Comment

error: Content is protected !!