राज्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांच्या जतन व संवर्धनाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून, भाविक आणि पर्यटकांसाठी अत्याधुनिक सोयी-सुविधांसह आरोग्य सुविधा पुरवण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या विविध तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत राज्यातील ६ प्रमुख तीर्थक्षेत्रे आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी एकूण ९९३.७२ कोटी रुपयांच्या सुधारित व नवीन विकास आराखड्यांना आणि निधीला मंजुरी देण्यात आली. या महत्त्वपूर्ण बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार धनंजय मुंडे आणि मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रकल्पांची वैशिष्ट्ये आणि मुख्यमंत्र्यांचे निर्देश केवळ जीर्णोद्धार नाही, तर आधुनिक पर्यटनावरही दिला जाणार भर विकास आराखड्याचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे केवळ जुन्या वास्तूंची डागडुजी न करता आधुनिक पर्यटन सुविधांवर लक्ष केंद्रित केले आहे. परळीत ‘मेरू पर्वता’वर भव्य शिवमूर्ती आणि लेझर शो, भीमाशंकरला केबल कार (रोप-वे), तर अजिंक्यतारा येथे ‘लटकता पूल’ (हँगिंग ब्रिज) उभारण्यात येणार आहे. यामुळे केवळ धार्मिकच नाही, तर साहसी व कौटुंबिक पर्यटनालाही प्रोत्साहन मिळेल. १. श्रीक्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग : २१०.४५ कोटी | अत्याधुनिक भक्त निवास, दर्शन बारी, शॉपिंग कॉम्प्लेक्स, १.६ किमी बायपास रोड.
२. श्रीक्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग : ₹ ३०१.५४ कोटी | मेरू पर्वतावर भव्य शिवमूर्ती, लेझर शो, वैदिक संग्रहालय, डिजिटल रांग व्यवस्था.
३. श्रीक्षेत्र भीमाशंकर आदर्श गाव : ₹ १७२.२२ कोटी | रस्ते रुंदीकरण (७ मीटर), केबल कार (रोपवे) सुविधा, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, बस स्थानक.
४. संत तुकाराम महाराज जन्मस्थान (देहू): ४१.७१ कोटी | जन्मस्थान मंदिर, भंडारा डोंगर परिसराचे संवर्धन, हरित क्षेत्र विकास, माहिती केंद्र.
५. किल्ले अजिंक्यतारा (सातारा) : १३४.८० कोटी | बुरुजांचे संवर्धन, राज सदरेचे पुनरुज्जीवन, अत्याधुनिक लटकता पूल (हँगिंग ब्रिज).
६. संगम माहुली समाधी स्थळ : १३३.०० कोटी | महाराणी ताराबाई, येसूबाई व शाहू महाराज समाधी जीर्णोद्धार, नवीन झुलता पूल.