नीट पेपरफूट प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी:जळगाव जामोदमध्ये काँग्रेसची मागणी; तहसीलदारांना निवेदन‎

नीट परीक्षा पेपरफूट प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशा मागण्या काँग्रेसच्या वतीने करण्यात आल्या आहेत. या संदर्भात पदाधिकाऱ्यांनी आज, दि. १८ मे रोजी तहसीलदारांना निवेदन दिले. त्यामध्ये नमूद केले की, देशात शिक्षण क्षेत्राचे व्यापारीकरण होत असून, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी गंभीर प्रकारे खेळ केला जात आहे. नीट परीक्षा पेपरफूट प्रकरणामुळे सुमारे २२ लाख ८० हजार विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम झाला आहे. या प्रकरणातील आरोपी कुलकर्णी, वाघमारे व इतर संबंधित अधिकारी आणि दोषींना तत्काळ सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. या प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी करून दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी. तसेच या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा द्यावा, अशा मागाण्या निवेदनाṇद्वारे करण्यात आल्या आहेत. तसेच सद्य:स्थितीत शेती मशागतीचे दिवस सुरू असून शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर हे महत्त्वाचे साधन आहे. मात्र, अनेक पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल दिले जात नसल्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर १५ ते २० किलोमीटरपर्यंत पंपावर न्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून, इंधनाचाही अपव्यय होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!