जालना जिल्ह्यातील समृद्धी महार्गावर एका भरधाव ट्रकने महिंद्रा पिकअपला उडवल्याने भीषण अपघात झालाय. या घटनेत 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतातील सर्व महिला असल्याचे समजते. या घटनेत पाच ते सहा जण गंभीर असल्याचे समोर आले आहे. जालन्यातली कडवंची शिवारात ही दुर्घटना घडली. या अपघातात मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे जाहीर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. समृद्धी महामार्गावरील अपघातस्थळी पोलिस दाखल झालेत. जखमींना रुग्णालयात हलवल्याचे समजते. मृतातील सर्व महिला या कामगार असून, त्या बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण आणि खादगाव येथील असल्याची माहिती आहे. त्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. कसा झाला अपघात? समृद्धी महामार्गावर गवत काढण्याचे काम सुरू होते. त्यासाठी महिला कामगार आल्या होत्या. या कामगारांची पिकअप व्हॅन जामवाडी शिवारात थांबली होती. तेव्हा नागपूरहून आलेल्या आणि मुंबईला जाणाऱ्या ट्रकने या पिकअप व्हॅनला पाठीमागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, सात महिला कामगारांचा जागीच मृत्यू झाला. महामार्गावर जेवणाचे डबे, चपला आणि इतर साहित्य व रक्ताचा अक्षरशः सडा पडलेला होता. अपघातातील जखमींची नावे १. प्रयागबाई बाबासाहेब वाघ (30/स्त्री) – डाव्या हाताच्या ‘रेडियस’ आणि ‘अल्ना’ अस्थींचे फ्रॅक्चर २. कविता विठ्ठल चौधरी (35/स्त्री) – डोक्याला दुखापत ३. दिनेश रंगनाथ गायकवाड (42/पुरुष) – डोक्याला दुखापत ४. अज्ञात (50/स्त्री) – डोक्याला दुखापत सर्व 4 जखमी रुग्णांना खाजगी रुग्णालयात पुढील उपचारांसाठी नेण्यात आले आहे. मृतकांची नावे १)अल्काबाई दादाराव आदमाने-(45, निधोना) २)लक्ष्मीबाई संतोष मदन- (35, केळीगव्हा) ३)मिना परमेश्वर आदमाने- (45, निधोना) ४)कांचनबाई प्रकाश आदमाने- (50, निधोना) ५)ताराबाई गहेनाजी चौधरी- (60, केळीगव्हान) ६)कडुबाई रामदास मदन- (55, केलीगव्हान) ७)सुमनबाई कचरु आदमाने- (70, निधोणा) ८) मंगलबाई शिनगारे मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताची दाखल घेतली असून 5 लाख रुपयांची आर्थिक मदत मृतांच्या वारसांना जाहीर केली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की, जालनानजीक समृद्धी महामार्गावर झालेल्या एका अपघातात 8 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे लोक जखमी झाले त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक स्वतः तेथे आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल. ‘त्या’ घटनेची आठवण ताजी समृद्धी महामार्गावर तीन वर्षापूर्वी झालेल्या भीषण अपघातामध्ये 25 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे अवघा देश हादरला होता. नागपूरहून पुण्याकडे निघालेल्या खासगी लक्झरी बस बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुंटा गावाजवळ असलेल्या एका दुभाजकाला धडकली होती. त्यानंतर बसने पेट घेतला होता. त्यामुळे बसमध्ये असणाऱ्या प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. बस पलटी झाल्याने बसचा दरवाजा हा खालच्या भाग बाजूला आला. त्यामुळे या आगीत पंचवीस जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. बसधले सर्व प्रवासी हे नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी होते. या अपघाताने पुन्हा एकदा जुन्या जखमा ओल्या झाल्या आहेत. अपघातांची मालिका सुरूच समृद्धी महामार्ग सुरू झाल्यानंतर केवळ सहा महिन्यात 950 हून अधिक अपघात झाल्याचे समोर आले होते. या अपघातामधील मृतांचा आकडा हा 70च्या आसपास होता. या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळला महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या. त्यात वेगाचे उल्लंघन करणार्या, लेन शिस्त न पळणार्या आणि टायर बाबत माहितीसाठी वाहन चालकांना प्रशिक्षण देण्यात येणार होते. त्यासाठी 8 ठिकाणी समुपदेशन केंद्र सुरू करावी, रस्ता सुरक्षाबाबत माहिती देणारे फलक अधिक प्रमाणात लावावे, सर्व टोल नाक्यावर PA system सुरू करणे, अवजड वाहनांच्या चालकांच्या विश्रांतीसाठी पार्किंगची व्यवस्था करणे आदींचा समावेश होता. यातील काही उपाययोजना पूर्णत्वासही गेल्या. मात्र, त्यानंतरही हे अपघात अजूनही सुरूच आहेत.
