“प्रभू श्री रामाचे आदर्श आचरण, भगवान श्रीकृष्णाची अचूक नीती आणि अखंड हरिस्मरण-नामसंकीर्तन यातच मानवाच्या आनंदी आणि समाधानी जीवनाचे खरे गमक दडलेले आहे,” असे निरुपण गायक तथा वक्ते राजेंद्र टाक यांनी केले. पारनेर तालुक्यातील आनंदाश्रम (रायतळे) येथे आयोजित त्रिदिन ‘राम कृष्ण हरी’ विशेष संगीत कथा सोहळ्यात ते बोलत होते. अधिकमासाचे पवित्र औचित्य साधून १७ मे ते १९ मे २०२६ या कालावधीत या अध्यात्मिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कथेच्या पहिल्या दिवशी श्रीरामाच्या जीवनावर प्रकाश टाकताना टाक म्हणाले, “श्रीरामकथेतून आपल्याला जीवन जगण्याचे अनेक मौल्यवान बोध मिळतात, जे आजच्या आधुनिक युगातही तितकेच महत्त्वाचे आहेत. रामायण हे केवळ एक महाकाव्य नसून, माणसाला आदर्श व सुसंस्कारीत जीवन जगण्याची दिशा दाखवणारा राजमार्ग आहे. दुसऱ्या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचे मर्म समजावून सांगताना ते म्हणाले की, बुद्धीमान, धर्माधारित आणि परिस्थितीनुरूप योग्य कृती करण्याची थोर शिकवण भगवान श्रीकृष्णाने दिली आहे. श्रीकृष्णाने मानवाला नेहमीच धर्म, कर्तव्य, प्रेम, सत्य आणि व्यावहारिक ज्ञान यांचा अचूक समतोल राखण्याचा अमर संदेश दिला. कथेची सांगता करताना टाक यांनी वारकरी संप्रदायाचा खरा अर्थ स्पष्ट केला. “जो माणूस आपल्या माता-पित्यांच्या ऋणाची जाणीव ठेवतो, जीवनात सेवा आणि दयाभावाचा अंगीकार करून अहंकाराचा पूर्णपणे त्याग करतो, तोच खरा वारकरी ठरतो; आणि अशाच निष्कलंक भक्ताला हरी पावतो,” असे त्यांनी सांगितले. या कथा श्रवण सोहळ्यासाठी रायतळे आणि परिसरातील पंचक्रोशीतून अनेक साधुसंत तसेच आध्यात्मिक क्षेत्रातील नामवंत मंडळी उपस्थित होती. आश्रमाच्या वतीने ह.भ.प. राघवानंद महाराज यांनी देवस्थानच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांची माहिती दिली. या सोहळ्याला सुपा पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक (पीआय) गडकरी मॅडम, भाजप पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, पंचायत समितीचे माजी सभापती अशोक झरेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोहळ्यात दररोज हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. आश्रमाच्या सर्व साधकांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. कथा सांगतेच्या प्रसंगी उद्योजक बापूसाहेब डोके यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
