उन्हाळ्यात कोपरगावच्या शेतीला अन् गावाला “निळवंडे’च्या पाण्याने दिलासा:सर्व तलाव, साठवण बंधारे भरू द्या, आमदार काळेंची पालकमंत्र्यांकडे मागणी‎

बहुप्रतीक्षित निळवंडे कालव्यांचे आवर्तन सोडण्यात आले आहे. कोपरगाव तालुक्यातील तळेगाव शाखा कालव्यातून वडझरी पॉईंट, बोडखेवाडी पॉईंट आणि शेख वस्ती पॉईंटमधून सध्या पाणी सुरळीतपणे सुरू आहे. यामुळे तालुक्यातील जिरायती भागातील नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. निळवंडेचे हे पाणी आता अंजनापूर गावापर्यंत पोहोचले असून, वडझिर पॉईंटमधून डांगेवाडी बंधाऱ्यात पाणी सोडणे सुरू आहे. हे पाणी पुढे वेस, सोयगाव, आणि बहादराबादपर्यंत पोहोचणार आहे. या पार्श्वभूमीवर, चालू आवर्तनातून कोपरगाव मतदारसंघातील सर्व पाझर तलाव, बंधारे आणि गावतळे पूर्ण क्षमतेने भरून देण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला द्याव्यात, अशी आग्रही मागणी आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे. अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याची टंचाई व मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक झाली. या बैठकीसाठी जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधींबरोबरच कोपरगावचे आमदार आशुतोष काळे हे देखील दूरदृश्यप्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) उपस्थित होते. या बैठकीत आमदार काळे यांनी कोपरगावच्या पाणी प्रश्नाकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. चालू वर्षी उन्हाची तीव्रता अत्यंत भीषण आहे. सुदैवाने गोदावरी कालव्यांचे आणि निळवंडेचे आवर्तन सुरू असल्यामुळे सध्या तरी कोपरगावमध्ये पाण्याचे मोठे संकट जाणवलेले नाही. जिरायती भागातील नागरिकांना या निळवंडे आवर्तनाचा मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, हवामान विभागाने चालू वर्षी पर्जन्यमान कमी राहण्याचा किंवा पाऊस लांबण्याचा अंदाज वर्तवला आहे. आमदार काळे यांनी पुढे स्पष्ट केले की, पाऊस सुरू होण्यास अजून अवधी असल्यामुळे, जर निळवंडेच्या याच सुरू असलेल्या आवर्तनातून जिरायती भागातील सर्व पाझर तलाव, बंधारे व गावतळे भरून घेतले, तर पाऊस पडेपर्यंत नागरिकांना व जनावरांना पाण्याचा कोणताही तुटवडा भासणार नाही. पालकमंत्र्यांचा प्रतिसाद, नागरिकांकडून आभार आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या या मागणीला जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला . पाटबंधारे विभागाला तशा सूचना देण्याचे मान्य केले. यामुळे भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई टळणार असल्याने कोपरगाव मतदारसंघाच्या जिरायती भागातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून, त्यांनी आमदार आशुतोष काळे यांचे विशेष आभार मानले आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!