चांदवड इथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी क्रांती मोर्चा काढला आहे. यामध्ये मुंबई-आग्रा महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. तीन हजार रुपये दराने शासकीय कांद्याची खरेदी करावी आणि विक्री झालेल्या कांद्याला पंधराशे रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. संतप्त शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्ग रोखला आहे. आंदोलक कार्यकर्ते आणि नेत्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून सरकारविरोधात तीव्र आक्रोश व्यक्त केला. आंदोलन हिंसक वळण घेत असल्याचे पाहून पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे आमदार रोहित पवार आणि काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नेत्यांना ताब्यात घेतल्यामुळे आंदोलक अधिकच आक्रमक झाले असून परिसरातील तणाव वाढला आहे. सरकारकडून कांदा उत्पादकांची दिशाभूल दरम्यान या आंदोलनावेळी बोलताना उबाठाचे अंबादास दानवे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे. त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांसह आंदोलक करत आहोत. सरकारने भाव काहीही जाहीर करू द्या, पण खरेदी काही झालेली नाही. केवळ घोषणेला काही अर्थ नाही. सरकारने एखाद्या शेतकऱ्याला भाव दिल्याची पावती दाखवावी. सरकारकडून कांदा उत्पादक शेतकरी आणि जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे. कांद्याला किमान 24 रुपये भाव द्यावा रोहित पवार म्हणाले की, आजच्या मोर्चाचे नेतृत्व हे सामान्य शेतकरी करत आहेत. आम्ही केवळ शेतकऱ्यांच्या मोर्च्यामध्ये उपस्थित आहोत. आमच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी यासाठी प्रयत्न केले आहे. 2023 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते की, कांद्याला 24 रुपये भाव देऊ आता निवडणूक झाल्यावर तुम्ही 12 रुपयांवर भाव देऊ म्हणतात. मग आम्ही आंदोलन केल्यावर साडेपंधरे रुपये रेट जाहीर केला पण यानेही काही फरक पडणार नाही. त्यामुळे दर वाढवण्यात यावा अशी आमची मागणी आहे, नाफेडने खरेदी वाढवली पाहिजे. नाफेडने कांदा भारताबाहेर विकला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांने आतापर्यत कांदा दिला त्यांना 10 रुपये अनुदान दिले पाहिजे. शेतकऱ्यांचा निम्मा खर्च सुद्धा आता निघत नाही. अवकाळी पाऊस, गारपीठ यामुळे शेतकऱ्यांना 18 ते 19 रुपये किलो उत्पादन खर्च आहे. त्यामुळे कांद्याला किमान 24 रुपये तरी भाव द्यावा, शेतकऱ्यांनी जगावे कसे? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे. सत्ताधारी विधान परिषदेच्या जागेसाठी परेशान रोहित पवार म्हणाले की, शेतकरी मरतोय आणि सत्ताधारी पक्षाचे नेते विधान परिषदेची कोणती जागा कोणाला सोडायची यावर चर्चा करत आहेत. सत्तेतील नेते विधान परिषदेच्या मागे लागले आहेत. शेतकरी जगावा यासाठी जी मदत करावी लागेल ती केली पाहिजे. शेतकरी सर्वच बाजूने संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने कोणीतरी उभे राहिले पाहिजे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. इंधन दरवाढीविरोधात पवारांची एनसीपी आक्रमक दुसरीकडे नागपुरात इंधन दरवाढीविरोधात पवारांची एनसीपी आक्रमक झाली असून त्यांनी त्याविरोधात आंदोलन सुरू केले आहे. यावेळी बोलताना अनिल देखमुख म्हणाले की, देशात महागाई वाढली आहे. याकडे ना राज्य सरकारचे लक्ष आहे ना केंद्र सरकारचे. दोन्ही सरकारने एकत्रित निर्णय घेत पेट्रोलचे दर कमी करण्यासाठी निर्णय घेतला पाहिजे. सत्ताधाऱ्यांचे संपूर्ण लक्ष हे विधान परिषदेच्या निवडणुकीकडे आहे. जनतेला होणाऱ्या त्रासाकडे बघायला त्यांना वेळ नाही. पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी झाल्या पाहिजे यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत.