मी कोणताही चुकीचा शब्द वापरला नाही:हर्षवर्धन सपकाळांचे स्पष्टीकरण; PM नरेंद्र मोदींविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप

देशातील आणि राज्यातील सध्याच्या परिस्थितीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्यास सुरू केले आहे. महाविकास आघाडीकडून काल (दि. 26 मे) कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्यावतीने 3 तास रस्ता जाम आंदोलन केले होते. या आंदोलनात बोलताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली होती. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. आज पुन्हा पत्रकार परिषद घेत हर्षवर्धन सपकाळ यांनी मी कोणताही चुकीचा शब्द वापरला नसल्याचे म्हणत स्पष्टीकरण दिले आहे. पत्रकार परिषदे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, काल कांदा प्रश्नी तीन तास रस्ता जाम आंदोलन केले. त्यात रोहित दादा होते, शशिकांत शिंदे होते, अंबादास दानवे होते तसेच इतर मित्र पक्ष होते. रस्ता जाम आंदोलनात लोक रस्त्यावर उतरले होते. याचा परिणाम म्हणजे आज सरकारचे मंत्रिमंडळाला दिल्लीला जावे लागले. हे मंत्रिमंडळ दिल्लीला गेले असले तरी हात हलवत परत येऊ नका हा आमचा त्यांना सज्जड दम आहे, असे सपकाळ यांनी म्हटले. मी कोणताही चुकीचा शब्द वापरलेला नाही पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर टीका करताना म्हटले की, हे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे. त्यांच्यामध्ये टोळी युद्ध सुरू झाले आहे. सत्तापिपासू लोक आहेत, त्यांचा हा फक्त सत्ता मिळवण्यासाठी खेळ सुरू आहे. तसेच हर्षवर्धन सपकाळ यांनी काल भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बोलताना अपशब्दांचा वापर केला होता. त्यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, मी कोणताही चुकीचा शब्द वापरलेला नाही. ‘दलिंदर’ हा जो शब्द आहे हा कॅरक्टर दाखवणारा, लक्षण दाखवणारा शब्द आहे. दरिद्री या संस्कृत शब्दातून तो शब्द आलेला आहे. मोदी आल्यापासून देशात गरीबी वाढली हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले, मोदी आल्यापासून देशात गरीबी वाढलेली आहे, शेतकऱ्यांचे भाव पडलेले आहेत, बेरोजगारी वाढलेली आहे, महिलांवरील अत्याचार वाढले आहेत, भ्रष्टाचार बोकाळला आहे आणि अशा परिस्थितीच्या संदर्भात काल मी त्यांचा तो उल्लेख केला. पण हा शब्द त्यांना खटकला असेल तर नरेंद्र मोदी हे ‘पनवती’ आहेत, हा समजेल असा शब्दप्रयोग मी पुन्हा एकदा करतो. प्राजक्त तनपुरेंविषयी काय म्हणाले शशिकांत शिंदे? तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटातील प्राजक्त तनपुरे हे भाजपच्या वाटेवर असल्याचे दिसत आहे. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे म्हणाले, निवडणुकीच्या माध्यमातून काही लोक तिकडे जात आहेत, ही बातमी मी सुद्धा ऐकली आहे. मात्र, अजून तरी त्यांच्याकडून पक्षाकडे राजीनामा किंवा त्यांचे मत व्यक्त केलेले नाही. परंतु, मला असे वाटते की मागच्या निवडणुकीच्या वेळी काही चौकश्या त्यांच्या मागे लावलेल्या होत्या. त्याच्या संदर्भात भाजपने दबावतंत्र वापरण्याचा प्रयत्न केला आहे. किंवा त्यांना काही आश्वासन दिले असतील तर मला असे वाटते की त्यांनी निर्णय घेतला असेल.

Leave a Comment

error: Content is protected !!