राहुरी माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शनिवारी मुंबई येथील प्रदेश कार्यालयात भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. त्यांचा भाजप प्रवेश झाल्यानंतर राहुरी येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. मुंबईतील मुख्य सोहळ्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तनपुरे यांनी जाहीर प्रवेश केला. भाजप प्रवेशानंतर बोलताना प्राजक्त तनपुरे यांनी पक्ष नेतृत्वासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे गटनेते प्रा. राम शिंदे आणि पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे विशेष आभार मानले. पक्ष आगामी काळात जी काही जबाबदारी देईल, ती मी प्रामाणिकपणे पार पाडेन. या नवीन इनिंगमुळे राहुरी तालुक्यातील प्रलंबित विकासाच्या प्रश्नांना आता खऱ्या अर्थाने गती मिळेल,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. नपुरे यांच्या या राजकीय भूमिकेमुळे राहुरी आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे राजकीय समीकरण पूर्णपणे बदलले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजप प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी देण्याची दाट शक्यता आहे. हा डाव यशस्वी ठरल्यास राहुरी तालुक्याला एकाच वेळी दोन आमदार मिळतील. दोन आमदार असल्यामुळे तालुक्याचा रेंगाळलेला विकास आता बुलेट ट्रेनच्या वेगाने होईल, असे संकेत राजकीय वर्तुळातून मिळत आहेत. फटाके वाजवत कमळाचे झेंडे घेऊन कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त केला. विखेंना साधावे लागणार कर्डिले-तनपुरे यांचे संतुलन या नव्या राजकीय भूकंपाचे पडसाद तालुक्याच्या आगामी सत्ताकेंद्रांवर पडणार आहेत. तालुक्यातील सहकारी संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता भाजपची ताकद दुपटीने वाढणार आहे. मात्र, दुसरीकडे जिल्ह्याचे नेते मंत्री विखे पाटील यांना आता आमदार अक्षय कर्डिले यांच्यासोबतच तनपुरे यांनाही सोबत घेऊन अंतर्गत राजकीय समतोल साधावा लागेल.