तालुका कृषी अधिकारी कार्यालयांचा पुढाकार
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव तालुक्यातील भालेवाडी येथे लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याचे बांधकाम सुरू असून, या उपक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील पाण्याची पातळी वाढवून शेती उत्पादनात वाढ व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
सहाय्यक कृषी अधिकारी प्रवीण कचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील नागरिक व शेतकऱ्यांच्या सक्रिय सहभागातून बंधाऱ्याचे काम प्रगतीपथावर आहे. या वनराई बंधाऱ्यामुळे परिसरातील भूजल पातळी वाढण्यास मदत होणार असून, त्याचा थेट लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे.

यावेळी भालेवाडी येथील शेतकरी रस्से यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, वनराई बंधाऱ्यामुळे पाण्याची साठवण क्षमता वाढून शेतीसाठी पाण्याची उपलब्धता सुधारेल. परिणामी पिकांचे उत्पादन वाढून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास निश्चितच मदत होईल.
तालुका कृषी अधिकारी दिपाली खवले यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, पाण्याची पातळी वाढल्यास पिकांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम होतो. जलसंधारणाच्या अशा उपक्रमांमुळे शेतीत आमूलाग्र बदल घडू शकतो. शेतकऱ्यांनी पुढे येऊन अशा कामांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

लोकसहभागातून साकार होत असलेला हा वनराई बंधारा भालेवाडी परिसरातील शेतीसाठी वरदान ठरणार असून, जलसंधारणाच्या दृष्टीने हा उपक्रम आदर्श ठरत आहे.
