भागवत शास्त्र आपल्या मनातील मृत्यूची भीती नाहीशी करते:त्याचे वाचन गरजेचे, न्हावी येथील भागवत कथेत राहुल भोळे यांचे निरूपण‎

भागवत शास्त्र हे माणसाच्या मनातील मृत्यूची भीती नाहीशी करणारे श्रेष्ठ शास्त्र आहे, असे निरूपण सावरगावकर राहुल महाराज भोळे यांनी केले. येथील सद्गुरु नारायणनाथ मंदिरामध्ये अधिक मासाचे (पुरुषोत्तम मास) औचित्य साधून आयोजित श्रीमद् भागवत पुराण कथा वाचन व गीता पारायण सोहळ्यात ते बोलत होते. कथेचे वाचन करताना भोळे यांनी सांगितले की, अभिमन्यू पुत्र राजा परीक्षित याला ब्राह्मणाचा शाप मिळाला. त्यानुसार सात दिवसांत तक्षक सर्प चावून मृत्यू होणार हे माहीत असूनही भागवत श्रवणामुळे त्याची भीती नष्ट झाली. त्याला मोक्ष मिळाला. तसेच अपत्य नसल्याने दुःखी झालेला चक्रवर्ती सम्राट राजा चित्रकेतू आणि अवंती नगरीतील त्रासलेला ब्राह्मण हे सर्व भगवंताच्या चिंतनानेच या संसारसागरातून तरून गेले. दैनंदिन जीवनात सर्व सुख-सुविधा असूनही माणूस समाधानी नसतो. मानवाला जीवनातील संकटांवर मात करून सुख व समाधान प्राप्त व्हावे, यासाठीच महर्षी व्यासांनी या ग्रंथात मानवी जीवनाशी तंतोतंत जुळणारे विविध दाखले दिले. ग्रंथ डोक्यावर घेऊन गावामध्ये प्रदक्षिणा पारायणाच्या समाप्ती प्रसंगी अन्नदाते ललित पांडुरंग चौधरी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पवित्र ग्रंथ डोक्यावर धारण करून मंदिराला दिंडीसह प्रदक्षिणा घातली. या सोहळ्यात परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Leave a Comment

error: Content is protected !!