Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

अजित पवारांचा ना दशक्रिया विधी, ना तेरावा:श्रीनिवास पवार यांचा मोठा खुलासा; 30 जानेवारीलाच सर्व विधी पूर्ण; पुढे धार्मिक कार्यक्रम नाही

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पारंपरिक धार्मिक विधींबाबत सुरू असलेल्या चर्चांना त्यांच्या बंधू श्रीनिवास पवार यांनी स्पष्ट उत्तर दिले आहे. 28 जानेवारी रोजी बारामतीकडे येत असताना झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या अपघातात विमान धावपट्टीवर कोसळल्यानंतर स्फोट होऊन अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. पुढील धार्मिक विधी कधी आणि कसे होणार याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात असताना, श्रीनिवास पवार यांनी माध्यमांशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली. अंत्यसंस्कारानंतरच्या विधींमध्ये 30 जानेवारी हा दिवस निर्णायक ठरल्याचे त्यांनी सांगितले. 29 जानेवारीला विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अस्थी सावडण्याचा कार्यक्रम झाला. त्याच दिवशी सोनगाव येथे कऱ्हा-नीरा संगमावर अस्थी विसर्जन करण्यात आले. याच वेळी आवश्यक असलेले सर्व धार्मिक विधी पूर्ण करण्यात आले, असे श्रीनिवास पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पुढे दशक्रिया किंवा तेरावा अशा कोणत्याही वेगळ्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. परंपरेनुसार मृत्यूनंतर दहाव्या किंवा तेराव्या दिवशी होणाऱ्या विधींची अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, कुटुंबीयांनी अस्थी विसर्जनावेळीच सर्व धार्मिक कृत्ये पूर्ण केल्याने अशा विधींची आवश्यकता उरलेली नाही, असेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे 6 फेब्रुवारीला अपेक्षित असलेला दशक्रिया विधी किंवा त्यानंतर तेरावा असा कोणताही सार्वजनिक कार्यक्रम होणार नाही, हे स्पष्ट झाले. या निर्णयाबाबत अजित पवारांच्या निकटवर्तीयांपैकी कोणीही अद्याप स्वतंत्र प्रतिक्रिया दिलेली नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार किंवा जय पवार यांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नसली, तरी श्रीनिवास पवार यांनी पवार कुटुंबीयांशी चर्चा करूनच ही माहिती जाहीर केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे धार्मिक विधींवर पडदा पडला असला तरी कुटुंबीयांकडून येणाऱ्या सांत्वनपर भेटींची मालिका मात्र सुरू आहे. आज काटेवाडी येथील ‘सहयोग’ निवासस्थानी पवार कुटुंबीय सांत्वनपर भेटी स्वीकारत आहेत. सुनेत्रा पवार यांनी 3 फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्या कराड येथे जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले होते. त्यानंतर त्या पुन्हा बारामतीत परतल्या. मंगळवारी त्या काटेवाडी येथे उपस्थित राहणार असून दुपारी चार वाजेपर्यंत सांत्वनासाठी येणाऱ्यांना भेटणार आहेत. सकाळपासूनच काटेवाडीत नेते, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पार्थ पवार यांना राज्यसभेवर संधी दरम्यान, या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबातील पुढील राजकीय हालचालींबाबतही चर्चा रंगू लागल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, पार्थ पवार यांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. सुनेत्रा पवार यांची राज्यसभेची मुदत 4 जुलै 2028 पर्यंत शिल्लक असली तरी, त्या जागेऐवजी सहा वर्षांच्या पूर्ण कार्यकाळाच्या दुसऱ्या जागेवर पार्थ पवार यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यसभेची रिक्त जागा लवकरच भरली जाणार असल्याची माहिती मिळत असून, त्यासाठी पार्थ पवार यांनी हालचाली सुरू केल्याचे सांगितले जाते. धार्मिक विधींना पूर्णविराम देतानाच पवार कुटुंब पुढील राजकीय घडामोडींमध्ये सक्रिय होत असल्याचे संकेत या घडामोडीतून मिळत आहेत. अजित पवार यांच्या स्मृतींच्या पार्श्वभूमीवर कुटुंबीयांनी धार्मिक बाबींचा अध्याय संपवला असला तरी, राजकीय अध्याय नव्याने उलगडत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!