Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

राज्यात स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा:एका मंत्र्याने मागितले दुसऱ्या मंत्र्याकडे सिलिंडर; मंत्री लोढांचे गॅसची मागणी करणारे पत्र व्हायरल

इराण विरुद्ध अमेरिका – इस्त्रायल युद्धामुळे राज्यात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. राज्यातील अनेक शहरांत स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. सरकार वारंवार निवेदन जाहीर करून असा कोणताही तुटवडा नसल्याचा दावा करत आहे. मात्र आता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीच एका पत्राद्वारे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे गॅस सिलिंडर्सची मागणी केल्यामुळे या तुटवड्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. प्रथम पाहू लोढा काय म्हणाले आपल्या पत्रात? मंगलप्रभात लोढा यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, चैत्र महिन्यात एकदाच येणाऱ्या ओली आयंबील हा जैन धर्मातील एक महत्त्वाचा सन आहे. या दिवशी उपवास, पूजा व विशेष धार्मिक विधी मोठ्या भक्तिभावाने पार पाडले जातात. या निमित्ताने मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर अंबिल (पारंपरिक पेय) तयार करून भक्तांना वितरण केले जाते. माझ्या मलबार हिल विधानसभा मतदारसंघातील 16 जैन मंदिरांमध्ये ओली (आयंबील) निमित्त मोठ्या प्रमाणावर व्यवस्था केली जाते. यासाठी प्रत्येक मंदिरास 5 गॅस सिलिंडरची आवश्यकता आहे. सबब, आपणास नम्र विनंती आहे की, या 16 जैन मंदिरांना प्रत्येकी 5 सिलिंडर उपलब्ध करून देण्यास सहकार्य करावे. जैन धर्मीय समाज आपल्याकडून या बाबतीत सकारात्मक मदतीची अपेक्षा ठेवून आहे. आपल्या सहकार्याबद्दल आम्ही मनःपूर्वक आभारी राहू. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची टीका दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मंगलप्रभात लोढा यांच्या या पत्रावरून सरकारवर सडकून टीका केली आहे. “गॅस सिलेंडरचा तुटवडा नाही, सर्वकाही सुरळीत चालले आहे आणि जनतेला व्यवस्थित गॅस सिलेंडरचा पुरवठा होत आहे,” असे केंद्र आणि राज्य सरकारमधील मंत्री बिनधास्तपणे सांगत आहेत. मात्र, त्याच वेळी राज्याच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री दुसऱ्या मंत्र्यांकडे गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्याची कबुली देत, कार्यक्रमाच्या अनुषंगाने योग्य पुरवठ्याची मागणी करत आहेत. हा स्पष्ट विरोधाभास नाही का? एकीकडे सरकार गॅस सिलेंडरची कुठेही समस्या नसल्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे त्याच सरकारमधील मंत्र्यांनाच तुटवडा जाणवत आहे. ही सरकारच्या खोटेपणाची कबुलीच नाही का? असा सवाल शरद पवार गटाने उपस्थित केला आहे. या मांडणीचा उद्देश केवळ सरकारच्या भूमिकेतील विसंगती दाखवण्याचा आहे. याचा कोणत्याही धर्म किंवा धार्मिक भावनांशी संबंध नाही आणि तसा कोणी अर्थही लावू नये, अशी टीपही या पक्षाने आपल्या पोस्टमध्ये जोडली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे महाराष्ट्रात सध्या गॅस सिलिंडरच्या तुटवड्याचा प्रश्न गंभीर होत असल्याचे चित्र आहे. त्याचे परिणाम सर्वसामान्य नागरिकांना भोगावे लागत आहेत. अकोला येथे गॅससाठी रांगेत उभ्या असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. यामुळे या समस्येची दाहकता वाढली आहे. परिणामी, राज्य सरकारने या प्रकरणी तात्काळ हस्तक्षेप करून पुरवठा साखळी मजबूत करणे, गॅसचा काळाबाजार रोखणे व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!