सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पंढरपूर पोलिसांनी वाहतूक व्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत त्यांना नोटीस बजावली होती. तसेच प्रशासनाने आंदोलनासाठी पर्यायी जागा सुचवली होती. मात्र, “शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी निवडलेले आंदोलनस्थळ बदलणार नाही,” अशी भूमिका घेत रोहित पवार आंदोलनावर ठाम राहिले. त्यामुळे आंदोलनस्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करून विनाअट सरसकट कर्जमाफीची मागणी करत त्यांनी आपल्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. विनाअट सरसकट कर्जमाफी द्यावी- पवार महायुती सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटी व शर्ती तात्काळ रद्द करून राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला विनाअट सरसकट कर्जमाफी द्यावी, या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी आमदार रोहित पवार पंढरपूरच्या ‘शिवतीर्थावर’ बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसत आहेत. शेतकऱ्यांच्या हक्काच्या इतर मागण्या पदरात पाडून घेतल्याशिवाय पंढरपुरातून मागे हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेत रोहित पवारांनी सरकारविरोधात आरपारची लढाई सुरू केली आहे. आंदोलन स्थळाचा आणि परिक्रमेचा मार्ग सुरुवात: श्री संत गाडगे बाबा मठ (स्टेशन रोड) येथून आंदोलनाला प्रारंभ होईल. तिथून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक (चौक) मार्गे मार्गक्रमण केले जाईल. त्यानंतर चौफाळा – पश्चिम द्वार ते नामदेव पायरी येथे विठ्ठलाचे दर्शन घेतले जाईल. मंदिर परिक्रमानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आंदोलक थेट ‘शिवतीर्थ’ (मुख्य आंदोलन स्थळ) येथे पोहोचतील आणि न्नत्याग आंदोलनाला बसतील.
प्रशासन मनाने आमच्याच सोबत! – रोहित पवार मार्ग अडवल्यानंतर रोहित पवारांनी ट्विट करत म्हटले की, “विठुरायाची पंढरी सर्व भक्तांसाठी कायम खुली असतानाही सरकार बॅरिकेड्स लावून आमच्या मार्गात अडथळे आणत आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार दिलाय. त्यामुळे अन्नदात्यासाठीच्या या अन्नत्याग आंदोलनात कितीही अडथळे आणले तरी हे आंदोलन थांबणार नाही.” सरकारच्या हुकूमशाही वृत्तीवर तोफ डागत ते पुढे म्हणाले, “सत्तेचा अहंकार जनतेच्या ताकदीसमोर कधीही टिकत नसतो. लढणाऱ्यांचे हात धरून आणि बोलणाऱ्यांचे तोंड दाबून सरकार स्वतःचाच पराभव सिद्ध करतंय. सरकारच्या दबावामुळे जिल्हा आणि स्थानिक प्रशासनाकडून अडथळे आणले जात असले, तरी मनाने मात्र प्रशासनातील सर्वजण आमच्यासोबत आहेत, हे सरकारने विसरू नये. कर्जमाफीच्या जीआर (GR) वरून शेतकरी आक्रमक राज्य सरकारने नुकतीच शेतकऱ्यांसाठी ३५ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केलीय. परंतु त्यासोबत जोडलेल्या अनेक अटी व शर्तींमुळे राज्यातील शेतकरी संघटनांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. कालच (११ जून) मंचर येथे विविध शेतकरी संघटनांनी एकत्र येत सरकारच्या या कर्जमाफीच्या जीआरची होळी केली होती.
