शहरासह मूर्तिजापूर, बोरगाव मंजू, अकोला एमआयडीसी, महान मत्स्यबीज केंद्र तसेच खांभोरा – उन्नई ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत येणाऱ्या ६४ गावांचा पिण्याच्या पाण्याचा मुख्य आधार असलेल्या महान धरणात सध्या २३.०९ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणात सुमारे ८ टक्के अधिक पाणीसाठा असूनही पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाने पाठ फिरवल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महान धरणात एकूण पाच व्हॉल्व बसवले आहेत. यापैकी तीन व्हॉल्व अद्याप पाण्याखाली असून दोन व्हॉल्व पाण्याबाहेर उघडे पडले आहेत. धरणातील उपलब्ध जलसाठा अकोल्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आला असून सध्या शेतकऱ्यांसाठी नदीपात्रात पाणी सोडणे बंद आहे. तीव्र उन्हामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होत असून पाणीपातळी दिवसेंदिवस घटत आहे. पावसाचा अंदाज व धरणातील जलसाठा लक्षात घेता नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महान पाटबंधारे विभागाने केले. गतवर्षी म्हणजे ११ जून २०२५ रोजी महान धरणातील पाणीपातळी ३४०.२३ मीटर होती. त्यावेळी धरणात १२.९२१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा म्हणजेच १४.९६ टक्के जलसाठा उपलब्ध होता. तर यावर्षी ११ जून २०२६ रोजी धरणातील पाणीपातळी ३४१.३१ मीटरवर असून १९.९४० दशलक्ष घनमीटर म्हणजे २३.०९ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणात सुमारे ८ टक्के अधिक पाणी आहे. गतवर्षी १२.९२१ घ.मी. साठा
