Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

काँगेसने मुस्लिम मतांवर मक्तेदारी समजू नये:प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर थेट हल्ला; काँग्रेसची रणनीती फसली? आंबेडकरांच्या वक्तव्याने राजकारण तापलं

मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत युती करत मोठ्या अपेक्षा बाळगल्या होत्या. मात्र निकालानंतर केवळ 24 जागांवर समाधान मानावं लागल्याने काँग्रेसच्या रणनीतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं एक वक्तव्य सध्या राजकीय वर्तुळात चांगलंच चर्चेत आलं आहे. काँग्रेसने मुस्लिम मतांकडे पाहण्याची भूमिका बदलली नाही, तर भविष्यात नुकसान अटळ असल्याचा थेट इशारा त्यांनी दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, मुंबईत वारंवार काँग्रेसच्या नेत्यांना आम्ही सूचना दिल्या होत्या. मुस्लिम मतं ही आपली ‘जहागीर’ असल्यासारखी वागणूक देऊ नका, असं आम्ही सांगत होतो. मात्र काँग्रेसने आमचं म्हणणं गांभीर्याने घेतलं नाही. निवडणूक निकालानंतर वास्तव समोर आलं असून, मुस्लिम मतदारांनी काँग्रेसची साथ सोडल्याचं स्पष्ट झालं आहे. दुसरीकडे हिंदू मतदार आधीच काँग्रेसपासून दुरावलेला आहे, असंही आंबेडकरांनी नमूद केलं. काँग्रेसच्या नगरसेवकांच्या विजयावर भाष्य करताना आंबेडकरांनी एक महत्त्वाचा दावा केला. काँग्रेसचे जे नगरसेवक निवडून आले आहेत, ते पक्षाच्या बळावर नाहीत, तर त्यांच्या वैयक्तिक ताकदीवर, कामावर आणि प्रतिभेवर निवडून आले आहेत, असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीवर प्रश्न उपस्थित केला. युती असूनही काँग्रेसने वंचितचा पुरेसा उपयोग करून घेतला नाही, असा आरोपही त्यांनी केला. मुंबईपुरताच नाही, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसची अवस्था अधिकच बिकट झाल्याचं चित्र असल्याचं आंबेडकरांनी स्पष्ट केलं. त्यांनी सांगितलं की, आम्ही वारंवार काँग्रेसला सांगत होतो की एक मोठी संयुक्त सभा घ्या. अशा सभेमुळे जनतेपर्यंत एक सकारात्मक संदेश गेला असता आणि आघाडीला मोठा फायदा झाला असता. मात्र काँग्रेसने आमचं काहीच ऐकलं नाही. याचा परिणाम म्हणजे छत्रपती संभाजीनगर महापालिकेत काँग्रेसला केवळ एकाच जागेवर समाधान मानावं लागलं. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या 115 जागांपैकी भाजपने 58 जागा जिंकत स्पष्ट आघाडी घेतली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 12, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 6, मनसेला 1 जागा मिळाली. मात्र या निवडणुकीत सर्वात मोठा धक्का देणारा पक्ष ठरला तो असदुद्दीन ओवैसी यांचा AIMIM, ज्यांनी 33 जागांवर विजय मिळवला. इतर पक्षांना मिळून केवळ चार जागा मिळाल्या, तर काँग्रेसचा जवळपास सफाया झाल्याचं चित्र दिसून आलं. प्रकाश आंबेडकरांनी यावेळी एक महत्त्वाचं राजकीय गणित मांडलं. त्यांच्या मते, जर छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस आणि वंचित एकत्र आले असते, तर जवळपास 40 ते 42 जागा निवडून आल्या असत्या. त्यातील 19 ते 20 नगरसेवक वंचितचे आणि उर्वरित काँग्रेसचे असते. अशा परिस्थितीत AIMIM ला तगडी टक्कर मिळाली असती आणि भाजपलाही एवढी मोठी मुसंडी मारता आली नसती. मात्र काँग्रेसने ज्या जागांसाठी वंचितसोबत वाद घातला, तिथेच त्यांची अवस्था अत्यंत खराब झाल्याचं आंबेडकरांनी ठामपणे सांगितलं. अनेक पक्षांवर भाजपचं अप्रत्यक्ष नियंत्रण दरम्यान, आगामी 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबतही प्रकाश आंबेडकरांनी मोठं विधान केलं आहे. वंचित बहुजन आघाडी या निवडणुका व्यापक स्तरावर लढणार असून, काँग्रेस आमच्यासोबत असेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. करारानुसार दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवावी, असं त्यांचं मत आहे. याचबरोबर भाजपने इतर पक्षांमध्ये घुसखोरी केल्याचा आरोप करत, आज अनेक पक्षांवर भाजपचं अप्रत्यक्ष नियंत्रण असल्याचा दावाही त्यांनी केला. राज्यातील महानगरपालिका निवडणुकांमध्ये वंचितने घवघवीत यश मिळवल्याचं सांगत, भविष्यातील राजकीय समीकरणांमध्ये आपली भूमिका निर्णायक ठरणार असल्याचा संदेश आंबेडकरांनी दिला आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!