जळगावचा तिढा अखेर सुटला!:एकनाथ शिंदेंच्या शब्दाला मान; विधान परिषद निवडणुकीतून बंडखोर रेश्मा काळेंची माघार, महायुतीला दिलासा

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये महायुतीसमोर उभा राहिलेला बंडखोरीचा मोठा पेच अखेर मिटला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतल्यानंतर निवडणुकीतील सक्रिय प्रचारातून माघार घेत असल्याची घोषणा केली. तसेच महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांना पाठिंबा देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या गोटात निर्माण झालेली अस्वस्थता दूर झाली असून जळगाव विधान परिषद निवडणुकीतील बंडखोरीचा अध्याय जवळपास संपुष्टात आल्याचे मानले जात आहे. शिंदेंच्या भेटीनंतर बदलली भूमिका रेश्मा काळे यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत शिंदे यांनी महायुतीच्या ऐक्यासाठी अधिकृत उमेदवाराच्या पाठीशी उभे राहण्याचा सल्ला दिला. त्यानंतर काळे यांनी तातडीने आपली भूमिका जाहीर करत महायुतीच्या निर्णयाचा आदर करणार असल्याचे सांगितले. सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत त्यांनी स्पष्ट केले की, “एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करत मी आजपासून प्रचार थांबवत आहे. महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना माझा पूर्ण पाठिंबा राहील.” महायुतीत निर्माण झाला होता मोठा पेच जळगाव विधान परिषद निवडणुकीत रेश्मा काळे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने महायुतीसमोर अनपेक्षित अडचण निर्माण झाली होती. उमेदवारी माघारीच्या दिवशी त्या माघार घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र त्यांनी निवडणूक रिंगणात कायम राहण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून त्या संपर्काबाहेर असल्याची चर्चा होती. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांची चिंता वाढली होती. जळगावमधील हे बंड निवडणुकीत महागात पडू शकते, अशीही भीती व्यक्त केली जात होती. गिरीश महाजनांचा दावा अखेर खरा काही तासांपूर्वीच मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावमधील तिढा सुटल्याचा दावा केला होता. तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील लवकरच यासंदर्भात घोषणा करतील, असेही त्यांनी म्हटले होते. त्यानंतर आज झालेल्या घडामोडींमुळे महाजनांचा दावा प्रत्यक्षात उतरल्याचे दिसून आले. नंदकिशोर महाजन यांचा मार्ग मोकळा रेश्मा काळे यांच्या माघारीमुळे महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा मार्ग अधिक सुकर झाल्याचे मानले जात आहे. विरोधकांकडून आव्हान असले तरी महायुतीतील अंतर्गत मतविभाजनाचा धोका आता जवळपास टळला आहे. जळगावमधील हा तिढा सुटल्याने महायुती नेतृत्वाने सुटकेचा निश्वास सोडला असून, विधान परिषद निवडणुकीपूर्वी संघटनात्मक एकजूट कायम ठेवण्यात एकनाथ शिंदे यांना यश आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. महायुतीला दिलासा, विरोधकांचे गणित बदलणार? नाशिकमध्ये भाजपच्या बंडखोरांनी माघार घेतल्यानंतर जळगावमधील बंडखोरीही थांबवण्यात महायुतीला यश आले आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर महायुती अधिक मजबूत स्थितीत असल्याचे चित्र आहे. रेश्मा काळे यांच्या निर्णयामुळे स्थानिक राजकारणातील अनेक समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!