थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हस्तक्षेप केल्यावर आणि मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, दादा भुसेंच्या मनधरणीनंतर भाजप बंडखोर प्रसाद हिरे, गोकुळ गितेंनी माघार घेतली. मात्र, जळगावातून शिंदेसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे ‘नॉट रिचेबल’ झाल्याने महायुतीच्या गोटात खळबळ उडाली आहे. जळगावमुळे नाशिकमध्ये ऐनवेळी दगाफटका होण्याची धास्ती शिंदेसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडेंना सतावत आहे. दरम्यान, सूत्रांनी सांगितले की, जळगावातील गुंता सोडवणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याच हाती आहे. त्यांच्या सूचनेवरून पालकमंत्री गुलाबराव पाटील शनिवारी बंडखोरी प्रकरणात अंतिम निर्णय घेतील, अशी शक्यता आहे. नुकसानीच्या भावनेने नुकसानीची भीती या निवडणुकीत मनपा निवडणुकीचा ‘खर्च’ निघेल, या मोठ्या आशेवर नाशिकमधील अनेक मतदार (नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य) होते. पण गिते, हिरेंच्या माघारीने मतदारांचा ‘भाव’ अचानक कोसळला. राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार, ‘लक्ष्मी दर्शना’चा आकडा दोनवरून थेट एकवर आल्याने मतदारांच्या अपेक्षांचा मोठा भंग झाला आहे. हे कधीही भरून न येणारे नुकसान असल्याची भावना अनेक नगरसेवक बोलून दाखवत आहेत. त्यांनी ही भावना मतदानात व्यक्त केली तर महायुतीचे नुकसान होऊ शकते, असे जाणकारांचे मत आहे.
