खतांचा संतुलित वापर या राष्ट्रीय मोहिमेंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने बाळापूर तालुक्यातील तामशी येथे नुकताच खरीपपूर्व शेतकरी मेळावा उत्साहात पार पडला. आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या मेळाव्यास परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या संकल्पनेतून, तसेच संशोधन संचालक डॉ. एस. एस. माने व कृषिविद्या विभागाच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अनिता चोरे यांच्या मार्गदर्शनात ‘शेतकरी शास्त्रज्ञ मंच’ व या मेळाव्याचे नेटके आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जल व मृद संधारण अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. राजेश पातोडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एम. एम. गणवीर, तामशीचे सरपंच आनंदा पातोडे, उपसरपंच भगवान पातोंड, अकोला मनपाचे नगरसेवक हर्षद भांबेरे आणि पिंपळगावचे माजी सरपंच विजय महानकर उपस्थित होते. बियाणे व साहित्याचे वाटप ः शेतकऱ्यांमध्ये जैविक जीवाणू द्रव्यांच्या बीजप्रक्रियेबद्दल जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी विद्यापीठाने निर्मित केलेल्या पी.डी.के.व्ही. बायो कन्सोर्टिया आणि कोरडवाहू शेती तंत्रज्ञानाच्या घडीपत्रिकांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जलतज्ज्ञ डॉ. राजेश पातोडे यांनी ‘एल-निनो’आणि त्याचा पावसावर होणाऱ्या संभाव्य परिणामाविषयी शेतकऱ्यांना सतर्क केले. त्यांनी पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन, जैविक बांध, पावसात दीर्घकाळ खंड पडल्यास मूलस्थानी जलसंधारणाचे उपाय आणि अतिवृष्टी झाल्यास शेतातून पाण्याचा सुरक्षित निचरा करण्यासाठी चर कसे खोदावेत, याचे तांत्रिक व प्रात्यक्षिक मार्गदर्शन केले. याप्रसंगी हर्षद भांबेरे आणि विजय महानकर यांनी मनोगत व्यक्त करून विद्यापीठाच्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. सांगितली जैविक बीजप्रक्रियेची पद्धत रविकिरण माळी यांनी शेतकऱ्यांना जैविक बीजप्रक्रियेचे महत्त्व व ती करण्याची पद्धत समजावून सांगितली. त्यानंतर वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एम. एम. गणवीर यांनी माती परीक्षण, मृदा आरोग्य पत्रिकेनुसार शिफारशीत खतांचा संतुलित वापर, शेणखत, कंपोस्ट खत शास्त्रोक्त पद्धतीने तयार करण्याबाबत माहिती दिली. तसेच कोरडवाहू शेतीतील आपत्कालीन पीक नियोजन व आंतरपीक पद्धतीवर प्रकाश टाकत त्यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाचे “महाविस्तार अॅप” डाऊनलोड करण्याचे आवाहन केले. कृषी विभागाच्या त्यांच्या या आवाहनास उपस्थित शेतकऱ्यांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
