पुणे जिल्ह्यातील नसरापूर (ता. भोर) येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या क्रूर अत्याचार आणि खून प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या खटल्याचे कामकाज अत्यंत वेगाने आणि दररोज चालवले जात असून, आतापर्यंत तब्बल ५३ महत्त्वपूर्ण साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयात नोंदविण्यात आल्या आहेत. येत्या महिनाभराच्या आतच या प्रकरणाचा अंतिम निकाल लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून, हा खटला महाराष्ट्राच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात जलद चाललेल्या खटल्यांपैकी एक ठरेल, असा विश्वास विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी व्यक्त केला आहे. १ मे रोजी घडलेल्या या थरारक घटनेनंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी तत्परता दाखवत तपास पूर्ण केला आणि जिल्हा न्यायालयात ११०० पानांचे अत्यंत सविस्तर दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले. २९ मे पासून विशेष न्यायालयात प्रत्यक्ष साक्ष नोंदवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली, ज्यामध्ये पहिल्याच दिवशी पीडित चिमुकलीच्या आई-वडिलांची साक्ष नोंदवण्यात आली. ११०० पानांचे दोषारोपपत्र आणि भक्कम पुरावे रेकॉर्डवर आतापर्यंत झालेल्या सुनावणीत नराधम आरोपीला फाशीच्या सुळापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारी पक्षाने अनेक भक्कम तांत्रिक आणि वैज्ञानिक पुरावे न्यायालयासमोर सादर केले आहेत. आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी डीएनएचे महत्त्वाचे वैज्ञानिक अहवाल रेकॉर्डवर घेण्यात आले आहेत. या प्रकरणातील एका महत्त्वाच्या बाल-साक्षीदाराची साक्षही न्यायालयाने अत्यंत काळजीपूर्वक नोंदवून घेतली आहे. तांत्रिक, डिजिटल आणि वैद्यकीय पुराव्यांशी संबंधित आधुनिक ‘इ-साक्ष’ प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. सोमवारी उर्वरित दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची तपासणी खटल्यातील ५३ साक्षीदारांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर आता केवळ दोन मुख्य साक्षीदार उरले आहेत. यामध्ये एक सायबर तज्ज्ञ आणि मुख्य तपास अधिकारी (IO) यांचा समावेश आहे. या दोन्ही प्रमुख साक्षीदारांची साक्ष नोंदवण्याचे काम उद्या, सोमवार (१५ जून) रोजी न्यायालयात सुरू होणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खटल्याचा युक्तिवाद सुरू होईल. राज्यातील सर्वात वेगवान खटला ठरेल! “नसरापूर प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालय दररोज यावर सुनावणी घेत आहे. तांत्रिक, वैज्ञानिक आणि प्रत्यक्षदर्शींचे पुरावे अतिशय भक्कमपणे रेकॉर्डवर आले आहेत. उर्वरित दोन साक्षीदारांची तपासणी सोमवारी पूर्ण होईल. ज्या गतीने हे कामकाज सुरू आहे, ते पाहता महिनाभराच्या आत पीडितेला न्याय मिळेल आणि हा राज्याच्या इतिहासातील सर्वात जलद गतीने चाललेला खटला ठरेल.” — ॲड. अजय मिसर, विशेष सरकारी वकील नेमके काय होते प्रकरण? १ मे रोजी भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात एका साडेतीन वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता आणि नराधम आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी केली जात होती. पोलिसांनी संशयित आरोपीला तातडीने अटक करून गजाआड केले असून, आता विशेष न्यायालयाच्या वेगवान भूमिकेमुळे पीडित कुटुंबाला लवकरच न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
