छत्रपती संभाजीनगर शहरातील पुंडलिकनगर भागात आज पहाटेच्या सुमारास एका दुमजली इमारतीत घरगुती गॅस सिलिंडरचा अत्यंत भीषण स्फोट झाला. या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या दुर्घटनेत एका 45 वर्षीय महिलेचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. स्फोटानंतर लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले असून, स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे इमारतीमधील इतर 9 जणांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. पहाटे साडेचार वाजता झाला घात
मिळालेल्या माहितीनुसार, पुंडलिकनगर येथील महारुद्र हनुमान मंदिराजवळ असलेल्या एका दुमजली इमारतीमध्ये खाली दुकाने आणि वरच्या मजल्यावर निवासी घरे आहेत. शनिवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास खालील एका दुकानाला अचानक आग लागली. पाहता पाहता या आगीने रौद्ररूप धारण केले आणि दुकानाच्या पाठीमागील खोलीत ठेवलेल्या चार सिलिंडरपैकी एका सिलिंडरचा गळतीमुळे भीषण स्फोट झाला. या स्फोटाचे हादरे परिसरातील अनेक घरांना बसले. या दुर्घटनेत पाठीमागच्या खोलीत राहणाऱ्या सुनंदा राजेंद्र मोरे (४५) या महिलेचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. 9 जणांना सुखरूप काढले बाहेर; महावितरणवर नागरिकांचा संताप
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणली. तत्पूर्वी, परिसरातील नागरिकांनी जीवाची बाजी लावून इमारतीत अडकलेल्या 9 जणांना सुखरूप बाहेर काढले. मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. स्फोटानंतर नगरसेवक अशोक दामलेंची संतप्त प्रतिक्रिया
या दुर्घटनेनंतर भाजपचे स्थानिक नगरसेवक अशोक दामले यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना महावितरणच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. दामले म्हणाले, घटना घडल्यानंतर आम्ही तातडीने महावितरणला वारंवार फोन करून वीजपुरवठा खंडित करण्याची विनंती करत होतो, परंतु त्यांनी कोणताही रिस्पॉन्स दिला नाही. आमच्या डोळ्यासमोर ती महिला खिडकीतून ‘वाचवा… वाचवा…’ म्हणून ओरडत होती, पण महावितरणच्या निष्काळजीपणामुळे आणि लटकत्या तारांमुळे आम्ही काहीच करू शकलो नाही.” महावितरणच्या या गलथान कारभारामुळेच निष्पाप महिलेला आपला जीव गमवावा लागला असून, त्यांच्यावर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि पीडित कुटुंबाला मोठी आर्थिक नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, अशी आक्रमक मागणीही नगरसेवक दामले यांनी केली आहे. दरम्यान, महावितरणच्या लटकणाऱ्या तारा आणि आग लागल्यानंतरही महावितरणने तात्काळ वीजपुरवठा खंडित न केल्यामुळेच संबंधित महिलेचा जीव वाचवता आला नाही, असा तीव्र आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हे ही वाचा.. भिवंडीत शोरमा-पिझ्झातून फूड पॉयझनिंग:लहान मुलांसह 37 जणांची प्रकृती बिघडली, फूड आउटलेट मालकावर गुन्हा बाहेरचे फास्ट फूड खाण्याची आवड असणाऱ्यांसाठी एक धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये घडली आहे. येथील एका नामांकित फूड आउटलेटमधून शोरमा आणि पिझ्झा खाणे अनेक कुटुंबांना चांगलेच महागात पडले. पिझ्झा खाल्ल्यानंतर काही तासांतच लहान मुलांसह तब्बल 37 जणांना फूड पॉयझनिंग झाली असून, त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सविस्तर वाचा
