शहरात शनिवारी (दि. १३) दुपारी अती हलक्या पावसाने हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे काही काळ शहरात गारवा निर्माण झाला होता. परंतु पाऊस काही मिनिटांचाच असल्याने त्यानंतर पुन्हा उकाड्याची तीव्रता वाढली. परिणामी नागरिकांना दमट वातावरणाचा सामना करावा लागला. एल निनोच्या संभाव्य परिणामांमुळे मान्सूनवर होत असलेला प्रभाव आणि त्यामुळे निर्माण झालेला पावसाचा विलंब शेतकऱ्यांची चिंता वाढवत आहे. अशा परिस्थितीत तुरळक स्वरूपात का होईना झालेला हा पाऊस क्षणीक समाधान देणारा ठरला. महाराष्ट्रातील कोकणात मान्सूनचे आगमन झाले असले तरी ८० टक्के महाराष्ट्राला अजूनही मॉन्सूनची प्रतिक्षा कायम आहे. शेतकऱ्यांनी शेतीची मशागत पूर्ण करून पेरणीसाठी तयारी केली असून ते आता वरुणराजाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान या पावसासोबत असलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील काही भागात वीज पुरवठा खंडीत झाला होता. तसेच कॅम्प भागात तर दोन ते अडीच तास वीज पुरवठा बंद होता.
