स्वच्छतेच्या क्षेत्रात विविध पुरस्कार प्राप्त केलेल्या तिवसा नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी प्रकल्पातील विविध उपक्रमांचा सविस्तर आढावासुद्धा घेतला. जिल्हाधिकारी येरेकर यांनी प्रकल्प परिसरात करण्यात आलेल्या विकासकामांचे, स्वच्छतेचे तसेच सौंदर्यीकरणाच्या उपक्रमांचे कौतुक केले. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा वि द्यार्थ्यांसाठी अभ्यासदौऱ्याचे केंद्र बनू शकतो, या दृष्टीने आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. प्रकल्पासाठी उपलब्ध असलेल्या उर्वरित जागेवर सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून हरित परिसर विकसित करण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले. यासोबतच बगीचा, मुलांसाठी खेळणी, झुले तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक उभारण्याच्या शक्यताही तपासण्यास सांगितले. भेटीदरम्यान त्यांनी तिवसा शहराच्या पाणीपुरवठा योजनेची माहिती घेतली. पुढील महिन्यात नगराध्यक्षांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील विविध पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नमो उद्यानाच्या कामांची माहिती घेऊन विविध विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी उपलब्ध होण्याच्यादृष्टीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या. यावेळी नगराध्यक्ष प्रतिभा गौरखेडे, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक वैभव वानखडे, तहसीलदार मयूर कळसे, मुख्याधिकारी शिवदास मुसळे, नायब तहसीलदार आशिष नागरे, नरेंद्र कुरळकर, अमोल देशमुख, अधीक्षक रोहन राठोड, अभियंता दयानंद डेहनकर, पाणीपुरवठा अभियंता ऋषिकेश देशमुख, स्वच्छता निरीक्षक राहुल इमले, कर निरीक्षक विकास गावंडे, सूरज शापामोहन, स्वच्छता दूत आशिष नांदगावकर, माऊली कन्सल्टंट प्रा.लि.चे संचालक उमेश राऊत तसेच तिवसा शहरातील नागरिक यावेळी उपस्थित होते. विलगीकरणासाठी निधीची गरज घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावर कचरा विलगीकरणाचे काम बंद असल्याचे लक्षात आल्यावर जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांशी त्या मुद्द्यावरही चर्चा केली. निधीची उपलब्धता नसल्याने हे काम बंद असल्याचे नगरपंचायत प्रशासनाचे म्हणणे होते. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या उन्नतीसाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, असा प्रस्ताव पाठवावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
