भटके आणि विमुक्त समाजाच्या‎प्रगती शिवाय देश महासत्ता नाही‎:डॉ. अरुण जाधव यांचे सोलापूर तसेच धाराशिवमध्ये स्वागत‎

इंग्रजांविरुद्ध आमचा बाप लढला असला तरी आमच्या नशिबी गुन्हेगारीचा कलंक लागला असल्याची खंत भटके विमुक्त समाज राज्य समन्वयक ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी व्यक्त केली. मुशाफिरी यात्रेअंतर्गत राज्यातील भटके विमुक्त समाजातील शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व संविधानाने दिलेले मूलभूत हक्क व अधिकारासाठी घरगणना व जनगणना करणे ही काळाची गरज आहे, भटक्या, विमुक्त समाजाच्या प्रगतीशिवाय देश महासत्ता होणार नाही, असे प्रतिपादन ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी केले. यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात सोलापूर व धाराशिव जिल्ह्यात आयोजित कार्यक्रमात ॲड. जाधव यांनी मार्गदर्शन केले. जाधव यांनी शहरातील कैकाडी, मदारी, पारधी, भिल्ल, वडार, नाथपंथी, गोसावी, जोशी, वासुदेव, वैदू व इतर भटके विमुक्त समाजाच्या पालावर, तांड्यावर जाऊन समाज बांधवांना मार्गदर्शन केले. प्रारंभी शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मुशाफिरी यात्रेचे स्वागत करण्यात आले. ही यात्रा सामाजिक कार्यकर्ते नागनाथ अडसूळ, मनिष देशपांडे यांच्या नियोजनात पार पडली. भटके विमुक्त समाजाचे नेते ॲड. जाधव यांनी यावेळी येथील सामाजिक कार्यकर्ते अडसूळ यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले व भविष्यात भटके विमुक्त समाजाच्या हक्कासाठी सर्वांनी एकत्र येऊन न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. मुशाफिरी यात्रेचे समन्वयक प्रा. संतोष चव्हाण, अडसूळ, मनिष देशपांडे, स्वाती ठोंगे यांची भाषणे झाली. भटक्या आणि विमुक्तांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज असल्याचे मतही यावेळी करण्यात आले.आभार प्रा. तुकाराम शिंदे यांनी मानले. ॲड. जाधव म्हणाले, “ज्या समाजाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी रक्ताचा सडा सांडला व इंग्रजांना सळो की पळो करून सोडले, अशा भटके विमुक्त समाजाच्या माथी जो गुन्हेगारीचा शिक्का मारून त्यांना कलंकित केले आहे, तो गुन्हेगारीचा शिक्का आजही स्वातंत्र्याच्या ७८ वर्षानंतर अजूनही पुसला नाही हे समाजाचे दुर्दैव आहे. त्यामुळे हा समाज जंगलात, डोंगरात, गावाबाहेर पालाची घरे करून शिक्षण, आरोग्य, घर, वीज, नागरिकत्वाचे दाखले यासाठी अजूनही संघर्ष करीत आहेत. त्यामुळे जोपर्यंत भटके विमुक्त समाजाची प्रगती होत नाही, तोपर्यंत देश महासत्ता होणार नाही. यासाठी घरगणना व जनगणना करून घेणे ही काळाची गरज आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!