महाराष्ट्रात महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सर्वात महत्त्वाची आणि श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेकडे सर्वच पक्षांची नजर आहे. विशेषतः शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांनी मुंबईत आपली ताकद वाढवली असून मुंबई महापालिकेवर आपल्याच पक्षाचा महापौर बसवण्याचा निर्धार या पक्षांनी केला आहे. यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होणार असल्याची शक्यता वर्तवली जात असून ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी राज ठाकरे यांच्या भेट घेतली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झाल्यापासूनच ठाकरे बंधूंच्या भेटी-गाठी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच आता अनिल परब यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. या भेटीत मनसे-ठाकरे गटाच्या युतीच्या घोषणेबाबत चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे. तसेच जागावाटप होत नाही, तोपर्यंत युतीची घोषणा नाही, असे ठरले असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे युतीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. युतीची चर्चा अंतिम टप्प्यात- नितीन सरदेसाई अनिल परब यांनी शिवतीर्थ येथे राज ठाकरे यांची भेट घेत युती संदर्भात चर्चा केल्यानंतर मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे आणि त्या पद्धतीने सगळ्यांचे काम सुरू आहे. युती संदर्भात ज्या काही चर्चा सुरू आहेत, त्यासाठी या भेटी-गाठी सुरू राहणारच. युती कधी जाहीर होईल हे आत्ताच सांगणे कठीण आहे. युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे आणि राज ठाकरे तुम्हाला याबाबतीत माहिती देतील. तसेच चांगल्या वातावरणात ही चर्चा सुरू आहे एवढे मी सांगू शकतो, अशी प्रतिक्रिया सरदेसाई यांनी दिली आहे. दरम्यान, महायुतीमध्ये मुंबई महापालिकेवरून अंतर्गत वाद असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजप या दोन्ही पक्षात जागावाटपावरून मतभेद आहेत. सध्या 77 जागांचा निर्णय बाकी असून यावर लवकरच निर्णय घेतला जाईल अशी माहिती भाजप नेते अमित साटम यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. तसेच दोन्ही पक्षात 130 जागांवर एकमत झाल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
