गडचिरोलीच्या दुर्गम भागात 20 हजार धुररहित चुलींचे यशस्वी वितरण:दरवर्षी 41 हजार टन जळाऊ लाकडाची होणार बचत

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा आणि एटापल्ली या दुर्गम आदिवासी तालुक्यांमध्ये 20 हजार धुररहित सुधारित चुलींचे यशस्वी वितरण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली राबवलेल्या या उपक्रमामुळे आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. क्लीन मॅक्स उर्जित एलएलपी आणि क्लायमेटसेन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने हा प्रकल्प पूर्णत्वास गेला आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांना धुरापासून मुक्ती मिळाली आहे. पारंपरिक चुलींमुळे होणाऱ्या वायुप्रदूषणामुळे महिला आणि बालकांना श्वसनाचे विकार आणि डोळ्यांच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. मात्र, या सुधारित चुलींमुळे घरातील प्रदूषण 100 टक्के थांबले असून, महिलांचे आरोग्य सुधारण्यास लक्षणीय मदत झाली आहे. पूर्वी दुर्गम भागातील महिलांना सरपण गोळा करण्यासाठी दररोज अनेक तास जंगलात घालवावे लागत होते. धुररहित चुलींमुळे जळाऊ लाकडाची गरज मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. तब्बल 95 टक्के कुटुंबांनी नोंदवले आहे की, लाकूड गोळा करण्याचा आणि स्वयंपाकाचा वेळ वाचल्यामुळे महिलांना कुटुंब, मुलांचे शिक्षण आणि स्वयंरोजगारासाठी अधिक वेळ देता येत आहे.हा उपक्रम केवळ आरोग्यापुरता मर्यादित नसून वनसंवर्धनासाठी महत्त्वाचा ठरला आहे.

या चुलींच्या वापरामुळे दरवर्षी तब्बल 41 हजार टनांहून अधिक जळाऊ लाकडाची बचत होणार आहे. यामुळे जंगलांवरील ताण कमी होऊन जैवविविधतेचे रक्षण होईल आणि निसर्गाचा समतोल राखण्यास मदत होईल.या पर्यावरणपूरक उपक्रमामुळे दरवर्षी अंदाजे 9 हजार 200 टन कार्बन डायऑक्साइड समतुल्य हरितगृह वायूचे उत्सर्जन टळणार आहे. जागतिक हवामान बदलाच्या संकटाशी लढण्यासाठी गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यातून उभे राहिलेले हे एक अत्यंत प्रभावी मॉडेल ठरले आहे. आतापर्यंत 19 हजार 600 हून अधिक कुटुंबांनी या उपक्रमाचा थेट लाभ घेत स्वच्छ ऊर्जेचा स्वीकार केला आहे. हा यशस्वी प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!