अचलपूर तहसील अंतर्गत येणाऱ्या सावळी दातूरा येथील शेतकऱ्यांची मौजे मुरादपूर व सावळी दातुरा येथे शेतजमीन आहे. या शेतकऱ्यांना शेतीकडे जाण्यासाठी सावळी ते हनवतखेडा ही डांबरी सडक आहे. सदर रस्त्याने गेल्यावर डावीकडे वळून दक्षिणेकडील रस्त्यावरील एका शेतकऱ्याने शेतीची मोजणी केल्यामुळे शिवरस्ता (वहिवाट) बंद झाला आहे. त्यामुळे त्या रस्त्याचा वापर करून शेती करणाऱ्या ७ ते ८ शेतकऱ्यांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे. या शेतकऱ्यांना आपापल्या शेतावर जाणे कठीण झाले आहे. गजानन कौतीककर यांचे शेत पडिक पडले आहे. गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून त्यांना शेतात जाता येत नाही. अशाप्रकारे अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यावर अन्याय होत आहे. त्यांनी रीतसर महसूल विभागाकडे दाद मागितली आहे. गजानन कौतीककर यांच्याकडे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ६९ आर एवढीच शेती आहे. मात्र शिवरस्त्याचा वाद निर्माण झाल्याने त्यांचे शेत पडिक पडले आहे. परिणामी कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशीच वेळ मिना वर्धे, श्यामसुंदर जरिए, रमेश प्रजापती, सुनील प्रजापती, अनिल प्रजापती, संजय प्रजापती, राजेश प्रजापती यांच्यावरही ओढवली आहे. शेतातील रस्त्यासाठी अचलपुरचे नायब तहसीलदार यांच्याकडे अपील दाखल करण्यात आली आहे. शेतात जाण्यासाठी शिवरस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्याद्वारे करण्यात आली आहे. सदर निवेदनानुसार शिवरस्त्याचा काही भाग धुऱ्याच्या काही भागावर मोकळा सुटतो. त्यामुळे तारेचे कुंपण सरकवून शेतकऱ्यांना वहिवाटीचा रस्ता मोकळा करून द्यावा. शेतात जाण्यासाठी या रस्त्याशिवाय दुसरा कोणताही रस्ता नाही. शेतीची मशागत व इतर कामे करण्यासाठी रस्ता आवश्यक आहे. न्यायाची मागणी केली शासनाकडे विशेष म्हणजे या शिवरस्त्याची नोंदसुद्धा शासकीय दप्तरी नमूद आहे. दुसरीकडे नायब तहसीलदार यांनीही शेतगटाची संयुक्त मोजणी करून शिवरस्त्याचा निशाणा कायम करून रस्ता वहिवाटीकरता देता येईल, असे आदेशात नमूद केले आहे. तरीही गजानन कौतीककर यांच्या शेतातून शिवरस्ता दाखविल्याने हा शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यांनी न्यायाची मागणी केली आहे.
