राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली असून तसे तहसीलदार माळशिरस यांना निवेदन देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माळशिरस तालुकाध्यक्ष देविदास ढोपे यांच्या नेतृत्वात दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाच्या नव्या कर्जमाफी योजनेतील जाचक अटींमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. २०१९ च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ ५० हजार रुपयांची मर्यादा न ठेवता सर्वांना २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी लागू करावी. तसेच एकरकमी समायोजन योजनेत दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनाही सवलतीचा लाभ देण्यात यावा, याशिवाय कर्जमाफीसाठी चार वर्षे नियमित कर्जफेड करण्याची अट रद्द करावी, २०१७ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या लाखो शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि पीकविमा योजनेतील जाचक अटी हटवून योजना पूर्ववत सुरू करावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देखील या निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
