प्रतिनिधी | अमरावती गॅस, पेट्रोल, डिझेल तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सोमवारी १ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन केले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महागाई विरोधात आंदोलनाचे आवाहन करण्यात आले होते. आंदोलनानंतर पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले. ते जिल्हाधिकारी अमरावती यांनी स्वीकारले. यावेळी बोलताना पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की, केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे महागाई सातत्याने वाढत असून सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, असंघटित कामगार, महिला, युवक व ज्येष्ठ नागरिक यांचे जीवन आर्थिक संकटात अडकले आहे.
यावेळी निवेदनाद्वारे घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती तत्काळ अर्ध्यावर आणाव्यात, पेट्रोल व डिझेलवरील करात कपात करून इंधनाचे दर कमी करावे, वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्याकरिता विशेष कृती आराखडा जाहीर करावा, गरीब, मध्यमवर्गीय कुटुंबांना आवश्यक वस्तुंवर अधिक अनुदान उपलब्ध करून द्यावे, सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक सक्षम करून सर्व पात्र कुटुंबांना धान्यासोबत खाद्यतेल, डाळी व इतर जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून द्याव्यात. कामगार शेतकरी मजूर व असंघटित क्षेत्रातील कष्टकरी जनतेसाठी विशेष दिलासा योजना लागू कराव्यात इत्यादी मागण्या करण्यात आल्या. सदर आंदोलनात पक्षाचे ज्येष्ठ नेते तुकाराम भस्मे, राज्य कार्यकारणी सदस्य अशोक सोनारकर, जिल्हा सचिव सुनील मेटकर, प्रा.साहेबराव विदळे, डॉ.ओमप्रकाश कुटेमाटे, सुनील घटाळे, निळकंठ ढोके, जे एम कोठारी, उमेश बनसोड, जयेंद्र भोगे, चंद्रकांत वडसकर, जितेंद्र कोरडे, शेतमजुर युनियनचे राज्य सचिव संजय मंडवधरे, संजय लांजेवार, दिनेश धुर्वे, प्रज्ञा बनसोड, मनोहर वाढणकर, संतोष सुरजुसे, हरिदास बुरे, बाबाराव इंगळे, लता हिवरकर, भूपत सोनवणे, पंचफुला शिंदे, अंबादास शेंडे, लता सोनारकर, संतोष राऊत, दिगंबर नगेकर, सुशील ढोले, राजेश मेश्राम उपस्थित होते.