नांदगाव तालुक्यातील साकोरा गावात जलजीवन मिशनअंतर्गत सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली पाणीपुरवठा योजना अद्याप पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. योजना पूर्ण झाल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात गावाला नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने ‘हर घर जल’चे स्वप्न अद्याप अपूर्णच राहिले आहे. निकृष्ट कामे, वारंवार फुटणारी पाइपलाइन, दूषित पाणीपुरवठा आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गावकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप होत आहे. एकेकाळी साकोरा ग्रामपंचायतीच्या विहिरीतून परिसरातील अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. मात्र वाढती लोकसंख्या, अपुरा पाऊस आणि वाढलेला पाणी वापर यामुळे गावात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली. त्यावर उपाय म्हणून विविध कालखंडात मन्याड नदी पाणीपुरवठा योजना, जलस्वराज योजना आणि गिरणा ५६ खेडी योजनेचा लाभ गावाला देण्यात आला. तरीही पाण्याचा प्रश्न कायम राहिला. तीन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जलजीवन मिशनची नवीन योजना मंजूर करण्यात आली. मात्र पाइपलाइन खडकाळ भागातून अपुऱ्या खोलीवर टाकल्याने चाचणीदरम्यान अनेक ठिकाणी गळती व फुटीच्या घटना घडल्या. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, योजनेतील जलकुंभ आणि फिल्टर प्लांटचीही स्थिती समाधानकारक नाही. ^जलजीवन योजनेचे काम निकृष्ट झाले असून, त्यात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा संशय आहे. ही योजना दीर्घकाळ टिकणारी वाटत नाही. त्यामुळे साकोरा गावाचा पुन्हा ७८ खेडी पाणीपुरवठा योजनेत समावेश करण्यात यावा. – सुरेश बोरसे, ग्रामस्थ गेल्या वर्षी चाचणी स्वरूपात पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, पाइपलाइन फुटल्यामुळे दूषित पाणीपुरवठा झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यानंतर गावात कावीळग्रस्त रुग्णांची संख्या वाढल्याचेही सांगितले जाते. परिणामी, ग्रामस्थांनी जलजीवन योजनेचा पाणीपुरवठा बंद करून पुन्हा जुन्या मन्याड पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून राहण्याचा निर्णय घेतला. सध्या गावाला २२ ते २५ दिवसांनी एकदा पाणी मिळत असून अनेकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. महिलांसाठी उभारण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयांचाही पाण्याअभावी अपेक्षित वापर होत नसल्याने गावाच्या विकासावर परिणाम होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. योजनेतील कथित अनियमिततेबाबत ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले होते. तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणीही केली आहे. मात्र अद्याप ठोस कारवाई न झाल्याने नाराजी कायम आहे. निकृष्ट कामांमुळे योजनेला घरघर जलजीवन मिशनअंतर्गत साकोऱ्यासाठी कोट्यवधी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. मात्र पाईपलाईन फुटणे, दूषित पाणीपुरवठा, निकृष्ट कामे, वाढीव निधी मंजुरी आणि अनियमिततेच्या आरोपांमुळे योजना वादात सापडली. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतरही कारवाई न झाल्याने गावाला आजही जुन्या योजनेवर अवलंबून राहावे लागत असून, पाणीटंचाई कायम आहे. ‘सीईओं’कडे चार वेळा तक्रारी ^ जलजीवन योजनेचे काम पूर्ण करून देण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे चार वेळा लेखी पाठपुरावा करण्यात आला आहे. संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणीही केली; मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. – रमेश बोरसे, माजी जिल्हा परिषद सदस्य योजनेबाबत नागरिकांच्या तक्रारी कायम ^योजनेच्या कामाबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी होत आहेत. त्यामुळे योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय ग्रामसभेच्या अखत्यारित ठेवण्यात आला आहे. तसेच आगामी आराखड्यात मन्याड नदीवर नवीन विहीर घेऊन जुनी जलस्वराज योजना पुनर्जीवित करण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला आहे. – अतुल बोरसे, माजी सरपंच तथा प्रशासक
