देवेंद्रजी आणि मी मित्र गमावला, दादा, तुमचा निर्णय चुकला:सभागृहात एकनाथ शिंदेंचा भावनिक हुंदका; अजितदादांच्या आठवणींनी विधानभवन भारावले

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वातावरण अत्यंत गंभीर आणि भावूक झाले. दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकप्रस्ताव मांडण्यात आला आणि त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. दादा म्हणजे स्पष्टवक्तेपणा आणि वक्तशीरपणाचं प्रतीक होतं, असे सांगताना शिंदे यांचा आवाज दाटून आला. दादा, तुमचा हा निर्णय चुकलेला आहे, माघारी या, असे शब्द उच्चारत त्यांनी सभागृहातील प्रत्येक सदस्याला भावूक केले. आज सभागृहात नजर टाकली की ते डोळ्यासमोर उभे राहतात, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. अधिवेशनाचा पहिला दिवस असताना गेली 22-23 वर्षे एकत्र काम केलेल्या सहकाऱ्याबद्दल अशा प्रकारे बोलण्याची वेळ येणे हे अत्यंत वेदनादायी असल्याचे शिंदे म्हणाले. अजित पवारांसारखा नेता गमावणे ही राज्यासाठी मोठी हानी आहे, असे त्यांनी नमूद केले. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही, असे सांगत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. कालची पत्रकार परिषद असो, शिवजयंतीचा कार्यक्रम असो किंवा आजचे सभागृह, प्रत्येक ठिकाणी त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवत आहे, असे ते म्हणाले. ज्या दिवशी अजित पवारांचे निधन झाले, त्या दिवशी प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते, असे सांगताना शिंदे भावूक झाले. लाख गेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, असे म्हणत त्यांनी नियतीपुढे माणूस हतबल ठरतो, याची जाणीव करून दिली. लाखो अनुयायांना पोरके करून ते गेले, असे त्यांनी सांगितले. या घटनेने पवार कुटुंबावर मोठा आघात झाला आहे, असे नमूद करताना त्यांनी स्वतःच्या आयुष्यातील दुःखद प्रसंगांची आठवण करून दिली. अपघातात दोन मुलांचे निधन आणि गुरु आनंद दिघे यांचे जाणे या वैयक्तिक वेदना त्यांनी सभागृहासमोर मांडल्या. देवेंद्रजी आणि मी मित्र गमावला आहे, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही उल्लेख केला. अजित पवारांच्या कामकाजाची शैली वेगळी आणि प्रभावी होती, असे शिंदे यांनी सांगितले. ते अत्यंत अभ्यासू होते आणि प्रशासनावर त्यांची पकड भक्कम होती. त्यांनी फाईल हातात घेतली की त्यातील त्रुटी लगेच लक्षात आणून द्यायचे. बैठकीत एखादा कागदाचा तुकडा पडला तरी ते त्यांना चालत नसे. कामातील शिस्त आणि काटेकोरपणा हे त्यांच्या स्वभावाचे भाग होते. ते कधीही नकारात्मक बोलत नसत. कोरोना काळातही ते मंत्रालयात जाऊन काम करत होते. अधिवेशन काळात ते पूर्णवेळ उपस्थित राहून विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देत असत. कामात तडजोड न करणे हा त्यांचा स्वभाव होता, असेही शिंदे म्हणाले. सरकार स्थापनेच्या चर्चांदरम्यान घडलेली एक आठवणही शिंदे यांनी सांगितली. पत्रकार परिषद सुरू असताना अजितदादांनी त्यांच्या हातातून माईक घेतला आणि एकनाथरावांचं माहिती नाही, पण मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. लाडकी बहीण योजना राबवायची आहे, असे जाहीर केले. त्या योजनेवर तिघांचे एकमत झाले होते आणि राज्याचा आर्थिक गाडा योग्य मार्गावर ठेवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, असे शिंदे म्हणाले. त्यांच्या दीर्घ अनुभवाचा सरकारला मोठा फायदा झाला. राजकारणात मतभेद आणि वाद असतात, पण अजित पवार अजातशत्रू होते, असे शिंदे यांनी नमूद केले. त्यांनी राजकारणात खिलाडूपणा जपला. नशिबाची साथ मिळाली असती तर ते निश्चितच मुख्यमंत्री झाले असते, असे त्यांनी स्पष्ट केले. अधिकाऱ्यांना पहाटे पाच वाजता बोलावून काम करून घेणे, 24 तास काम करणारे सरकार उभे करणे आणि निर्णयांबाबत ठाम राहणे, हे त्यांचे वैशिष्ट्य होते. काही विधानांमुळे ते अडचणीत आले, पहाटेचा शपथविधी झाला, संपूर्ण जबाबदारी त्यांच्या अंगावर आली; तरी ते मागे हटले नाहीत, असे शिंदे यांनी सांगितले. सुनेत्रा पवार यांनी जबाबदारी स्वीकारली, आम्ही त्यांच्या पाठीशी शेवटी शिंदे म्हणाले की, आज सभागृहात पाहताना दादा समोरच उभे असल्यासारखे वाटते. त्यांचा स्पष्टवक्तेपणा आणि वक्तशीरपणा कायम स्मरणात राहील. सुनेत्रा पवार यांनी जबाबदारी स्वीकारली असून कार्यकर्त्यांना धीर देत आहेत. आम्ही त्यांच्या पाठीशी ठाम उभे आहोत. विकास आता लांबणार नाही, विकास आता थांबणार नाही, ही घोषणा पुढे नेत राहू, असे आश्वासन देत त्यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला. सभागृहात काही क्षण शांतता पसरली आणि प्रत्येक सदस्याने या नेतृत्वाच्या स्मृतींना आदरांजली अर्पण केली.

Leave a Comment

error: Content is protected !!