एकीकडे वाढते तापमान, कमी होत चाललेली वृक्षसंख्या आणि पर्यावरण संवर्धनाची वाढती गरज याबाबत केवळ चिंता व्यक्त होत असताना, जुन्नर तालुक्यातील नवलेवाडीने मात्र कृतीतून एक नवा आदर्श घालून दिला आहे. वृक्षारोपण आणि साहित्याचा अनोखा संगम घडवत नवलेवाडीतील गायरान परिसरात ‘श्रीनाथ फाउंडेशन नवलेवाडी’ आणि ‘पिंपरी पेंढार सोशल युथ फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण सोहळा आणि कवी संमेलनाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. केवळ औपचारिकता म्हणून झाडे न लावता, या उपक्रमात दूरदृष्टी ठेवून सुमारे १२५ कलमी केशर आणि हापूस आंब्यांच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. भविष्यात ही झाडे जुन्नरच्या निसर्गाला हिरवेगार करणार असून, या परिसरातील ग्रामीण जैवविविधतेलाही यामुळे मोठी चालना मिळणार आहे. या कार्यक्रमाला सहायक वनसंरक्षक रामदास पुजारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या उपक्रमात विजय लोंढे, रमेश खरमाळे, जितेंद्र बिडवई, वसंत जगताप, सुधाकर डुंबरे, कृषी सहाय्यक राजश्री नरवडे, विमलेश गांधी, वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन कांबळे, नितीन शेलार आणि प्रमोद ढगे या मान्यवरांच्या हस्ते प्रत्यक्ष वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण होते. पर्यावरण रक्षणासाठी समाजाने एकत्र येण्याची गरज असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. या उपक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरण संवर्धनाचा संदेश केवळ फावडं-कुदळ हातात धरूनच नाही, तर कवितेच्या माध्यमातून मनामनात पोहोचवण्यात आला. यावेळी रंगलेल्या काव्य संमेलनात नामवंत कवींनी सामाजिक प्रश्न, पर्यावरण आणि ग्रामीण जीवनावर आधारित कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. काव्य संमेलनात संदीप वाघोले, जयराम तांबे, श्रीकांत ढेरंगे, डॉ. केशव बोरकर, राजेश दुरगुडे, डॉ. जयसिंग गाडेकर, साईनाथ पाचारणे, विलास हाडवळे, जालिंदर डोंगरे आणि डॉ. रोहिणी मेहेर या कविंनी सहभाग घेतला.
