मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली असून, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची अधिकृत घोषणा होणार असल्याची ठोस माहिती समोर आली आहे. ही घोषणा एका भव्य संयुक्त मेळाव्यातून होणार असून, याच व्यासपीठावर ठाकरे बंधू पहिल्यांदाच निवडणूक युतीचा नारा देतील. 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत असल्याने, त्याआधीच म्हणजे येत्या सोमवारपर्यंत युतीची घोषणा करण्यावर दोन्ही पक्षांचे नेतृत्व ठाम असल्याचे समजते. त्यामुळे मुंबईसह ठाणे, नाशिक आणि इतर महत्त्वाच्या महापालिकांमध्ये राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील मनोमिलन झाल्याची चर्चा काही काळापासून सुरू होती. मात्र युतीची अधिकृत घोषणा कधी होणार, याकडे शिवसैनिक आणि मनसैनिक उत्सुकतेने पाहत होते. ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनुसार, ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन मोठ्या शक्तीप्रदर्शनासह युती जाहीर केल्यास कार्यकर्त्यांमध्ये नवे चैतन्य निर्माण होईल. विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत याचा थेट फायदा होईल, असा दोन्ही पक्षांचा विश्वास आहे. त्यामुळे केवळ संयुक्त पत्रकार परिषद न करता, भव्य मेळाव्याच्या माध्यमातून मराठी मतदारांना थेट संदेश देण्याची रणनीती आखण्यात आली आहे. जाहीरनामा आणि उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध होण्याचीही शक्यता युतीच्या घोषणेसोबतच ठाकरे बंधूंकडून निवडणुकीसाठीचा संयुक्त जाहीरनामा आणि उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध होण्याचीही दाट शक्यता आहे. सध्या ठाकरे गट आणि मनसे यांच्यात जागावाटपाबाबत सखोल चर्चा सुरू असून, पुढील दोन ते तीन दिवसांत या चर्चेचा अंतिम तोडगा निघण्याची शक्यता आहे. जागावाटप पूर्ण होताच उमेदवार निश्चितीला गती दिली जाणार असून, पहिली यादी युतीच्या घोषणेदिवशीच जाहीर करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे महायुतीसह इतर विरोधी पक्षांवर मानसिक दबाव निर्माण करण्याचा ठाकरे बंधूंचा डाव असल्याचेही बोलले जात आहे. सर्वच राजकीय पक्षांची युद्धपातळीवर तयारी दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम आधीच जाहीर झाला आहे. 23 डिसेंबरपासून नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होणार असून 30 डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. 31 डिसेंबर रोजी अर्जांची छाननी होईल, तर 2 जानेवारीपर्यंत उमेदवारी माघार घेता येणार आहे. 3 जानेवारी रोजी अंतिम उमेदवार यादी आणि निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. 15 जानेवारी रोजी मतदान होईल आणि 16 जानेवारीला निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे वेळ अत्यंत कमी असून, सर्वच राजकीय पक्ष युद्धपातळीवर तयारी करत आहेत. मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची युती ही केवळ राजकीय गणितापुरती मर्यादित नसून, मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. मुंबईवरील सत्ता राखण्यासाठी ठाकरे गट आणि मनसे एकत्र येत असल्याने, आगामी निवडणूक ही अत्यंत चुरशीची ठरणार आहे. ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेची तारीख, स्थळ आणि स्वरूप याबाबत अंतिम निर्णय लवकरच जाहीर केला जाईल. मात्र, या युतीच्या घोषणेने राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार, हे मात्र निश्चित मानले जात आहे.
