शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि महायुतीवर केलेल्या टीकेला भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “ऑपरेशन टायगर, ऑपरेशन वुल्फची भाषा करणाऱ्या संजय राऊतांना प्रत्यक्षात ऑपरेशन गिधाडच शोभते,” अशा शब्दांत बन यांनी हल्लाबोल करत राऊतांवर वैयक्तिक आणि राजकीय दोन्ही स्तरांवर निशाणा साधला. भाजपच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ बन यांनी ठाकरे गटातील कथित अंतर्गत नाराजी, खासदारांची अनुपस्थिती, रोहित पवारांचे आंदोलन, पाकिस्तानबाबतची भूमिका आणि मुंबईतील जैन-पांढरी पट्टी वाद अशा अनेक विषयांवर भाष्य केले. “गिधाडासारखी प्रवृत्ती, संकटावर राजकारण” संजय राऊत यांनी अलीकडे “ऑपरेशन टायगर” आणि “ऑपरेशन वुल्फ” अशा शब्दांत भाजपवर टीका केली होती. त्याला उत्तर देताना बन म्हणाले की, गिधाड जसे मृत्यू आणि संकटांवर टपून बसते, त्याचप्रमाणे राऊत यांची राजकीय शैली आहे. “महाराष्ट्राच्या हिताचे राजकारण करण्याऐवजी संकटांवर राजकारण करण्याची त्यांची सवय आहे. त्यामुळे त्यांना ऑपरेशन टायगर नव्हे, तर ऑपरेशन गिधाडच शोभते,” असा टोला त्यांनी लगावला. “खासदारांनी उद्धव ठाकरेंना व्हर्च्युअल ठेंगा दिला” ठाकरे गटातील काही खासदार बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित न राहता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाल्याच्या मुद्द्यावरूनही बन यांनी जोरदार टीका केली. “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घरात बसून फेसबुक लाईव्ह आणि व्हर्च्युअल पद्धतीने कारभार चालवत होते. आता त्यांच्या खासदारांनीही त्यांनाच त्याच भाषेत उत्तर दिले आहे. व्हर्च्युअली बैठकीला उपस्थित राहून त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना ठेंगा दाखवला आहे,” असा दावा त्यांनी केला. तसेच, “ज्याप्रमाणे महाराष्ट्र व्हर्च्युअल पद्धतीने चालत नाही, त्याचप्रमाणे राजकारणही केवळ ऑनलाईन बैठकींवर चालत नाही,” असे ते म्हणाले. “तुमचे खासदार सांभाळा, ममता बॅनर्जींची चिंता करू नका” पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसमधील फुटीवरून भाजपवर टीका करणाऱ्या संजय राऊतांनाही बन यांनी लक्ष्य केले. “तुम्हाला तुमचे नऊ खासदार सांभाळता येत नाहीत आणि तुम्ही ममता बॅनर्जींच्या पक्षाची चिंता करत आहात. तृणमूलचे खासदार कुठे जायचे हा त्यांचा निर्णय आहे. त्यात संजय राऊतांनी शहाणपण शिकवण्याची गरज नाही,” असे ते म्हणाले. ठाकरे गटातील खासदार आणि आमदारांमध्ये वाढती अस्वस्थता असल्याचा दावाही त्यांनी केला. “ऑपरेशन टायगर झालं तर कळणारही नाही” गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या कथित “ऑपरेशन टायगर” संदर्भात बोलताना बन यांनी सूचक विधान केले. “विधानसभा निवडणुकीपूर्वी ४० आमदार पक्षातून बाहेर पडले तेव्हा संजय राऊतांना काहीच कळलं नव्हतं. त्यामुळे भविष्यात काही घडलं तरी त्यांना आधी कळेल अशी अपेक्षा ठेवू नये,” असे म्हणत त्यांनी ठाकरे गटाला टोला लगावला. रोहित पवारांच्या आंदोलनावरही निशाणा शेतकरी कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आंदोलनावर बोलताना बन यांनी त्याला “नौटंकी” आणि “स्टंटबाजी” असे संबोधले. “जर शेतकऱ्यांची एवढीच चिंता असेल तर आधी स्वतःच्या साखर कारखान्यांमधील शेतकऱ्यांची थकबाकी द्यावी. उपोषण करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करावी,” असे ते म्हणाले. रोहित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावरही त्यांनी यावेळी टीका केली. मोहन भागवतांच्या भूमिकेचे समर्थन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारत-पाकिस्तान संबंधांबाबत केलेल्या वक्तव्याचे समर्थन करताना बन म्हणाले की, शेजारी राष्ट्रांशी संवाद ठेवणे ही व्यावहारिक भूमिका आहे. “दोन देशांमध्ये चांगले संबंध राहिले तर दोघांचाही फायदा होतो. त्यावर टीका करणे म्हणजे राजकीय अपरिपक्वता आहे,” असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी संजय राऊतांवर “पाकिस्तानचे प्रवक्ते असल्यासारखी भूमिका घेतात” असा आरोपही केला. “भाजप विचारांवर चालतो, व्यक्तींवर नाही” भाजपमध्ये फूट पाडण्याच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना बन म्हणाले की, भाजप हा कार्यकर्ते आणि विचारांवर उभा असलेला पक्ष आहे. “भाजप फोडण्यासाठी एका संजय राऊतांनी नव्हे तर शंभर संजय राऊतांनी जन्म घ्यावा लागेल. हा पक्ष छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू राम आणि हिंदुत्वाच्या विचारांवर चालतो,” असे ते म्हणाले. जैन-पांढरी पट्टी वादावर संयमाची भूमिका मुंबईतील जैन समाजाकडून रस्त्यांवर मारल्या जाणाऱ्या पांढऱ्या पट्ट्यांच्या वादावरही नवनाथ बन यांनी भूमिका स्पष्ट केली. “कायद्याचे उल्लंघन झाले असेल तर महापालिका कारवाई करेल. मात्र या मुद्द्यावरून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणे चुकीचे आहे. प्रत्येक धर्माने एकमेकांच्या भावना आणि श्रद्धांचा आदर केला पाहिजे,” असे ते म्हणाले.
संजय राऊतांना ऑपरेशन टायगर नव्हे, ऑपरेशन गिधाडच शोभते!:भाजपचा जोरदार पलटवार, म्हटले- संकटांवर राजकारण करण्याची त्यांची सवय!
auto_awesomeथोडक्यात महत्त्वाचे
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि महायुतीवर केलेल्या टीकेला भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "ऑपरेशन टायगर, ऑपरेशन वुल्फची भाषा करणाऱ्या संजय राऊतांना...