बातमी ऐका (Marathi Voice Reader)
खाकी वर्दीचे स्वप्न उराशी बाळगून रोज भल्या पहाटे रक्ताचे पाणी करणारा, २८ वर्षांच्या सुहासचा धावण्याचा सराव करताना हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी अंत झाला. धुळे तालुक्यातील नगाव येथे सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडलेल्या या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
आई-वडिलांचा आधार गेला
सुहास संभाजी पाटील (वय २८) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. सुहास हा अत्यंत गरिबीतून आणि हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आला होता. सततची मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर अवघ्या ६ महिन्यांपूर्वीच त्याची ‘महाराष्ट्र सुरक्षा दलात’ निवड झाली होती. मुंबईत नोकरीला असलेला सुहास काही दिवसांच्या सुट्टीसाठी धुळ्यातील आपल्या नगाव या मूळ गावी आला होता.
खाकी वर्दी मिळाली तरीही पुढे अजून मोठी पोलीस भरती मारायची, या जिद्दीने तो रोज न चुकता सराव करत होता. सोमवारी सायंकाळीही तो गावाजवळील रस्त्यावर धावण्याचा सराव करत होता. सराव करताना अचानक त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो रस्त्यावरच कोसळला. उपस्थितांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला तातडीने रुग्णालयात हलवले, मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
नगाव गावात दोन वर्षांत दुसरी घटना
सुहासच्या या अकस्मात जाण्याने नगाव आणि परिसरात प्रचंड भीतीचे व हळहळीचे वातावरण पसरले आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, या गावात गेल्या दोन वर्षांत घडलेली ही दुसरी हृदयद्रावक घटना आहे. याआधी ४ मार्च २०२४ रोजी जयेश कैलास पाटील या अवघ्या १९ वर्षांच्या तरुणाचाही असाच धावताना हृदयविकाराने मृत्यू झाला होता. ऐन उमेदीच्या काळात, अंगात ताकद असताना आणि पोलीस भरतीचे स्वप्न डोळ्यात असताना अचानक काळजाचे ठोके बंद पडल्याने ‘हे नक्की काय घडतंय?’ या विचाराने नगाव ग्रामस्थ आणि तरुण धास्तावले आहेत.
डॉक्टरांनी दिला सल्ला
ऐन तरुण वयात धावताना किंवा व्यायाम करताना येणाऱ्या या सायलेंट हार्ट अटॅकबाबत हृदयरोग तज्ज्ञांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. पोलीस भरती किंवा इतर खेळांचा कडक आणि कठीण सराव करणाऱ्या तरुणांनी वेळोवेळी आपल्या हृदयाची तपासणी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. सरावादरम्यान अचानक चक्कर येणे, अतिप्रमाणात घाम येणे, छातीत किंवा पाठीत न कळणारी अस्वस्थता जाणवल्यास सराव तात्काळ थांबवून डॉक्टरांचा सल्ला घ्या.