संरक्षित सिंचनासह एकात्मिक शेतीला मिळणार बळ; कृषी विभागाचा पुढाकार
सुरेश पाचभाई | मारेगाव
मारेगाव : एल निनोच्या प्रभावामुळे पाऊसमान कमी राहण्याची शक्यता असून आगामी काळात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत आहेत. या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी मारेगाव तालुका कृषी विभागाने जलसंधारण व संरक्षित सिंचनावर भर दिला असून मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत बोरी (बु.) येथील शेतकरी महादेव विठोबा वडे यांच्या शेतात शेततळे पूर्ण करण्यात आले आहे.
पावसाचे अनिश्चित प्रमाण आणि पिकांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर हे शेततळे शेतकऱ्यांसाठी ‘पाण्याची शाश्वती’ ठरणार आहे. साठवलेल्या पाण्याचा उपयोग संरक्षित सिंचनासाठी करून प्रतिकूल हवामानातही पिकांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या शेततळ्याच्या माध्यमातून केवळ सिंचनापुरते मर्यादित न राहता एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल विकसित करण्याचा कृषी विभागाचा मानस आहे. शेततळ्याच्या परिसरात कुक्कुटपालन, मत्स्यपालन, शेळीपालन तसेच पारंपरिक शेती असे विविध पूरक व्यवसाय एकत्रितपणे राबविण्यासाठी शेतकऱ्याला आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन व मदत करण्यात येणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी दिपाली खवले यांनी सांगितले.

शेततळे म्हणजे केवळ पाणीसाठा नव्हे, तर शेतकऱ्याच्या उत्पन्नाला पर्यायी आधार देणारे केंद्र ठरू शकते. मत्स्यपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन आणि शेती या माध्यमातून शेतकऱ्याच्या उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण करण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील असल्याचे मंडळ कृषी अधिकारी किशोर डोंगरकार यांनी स्पष्ट केले.
शेततळे पूर्ण करण्यासाठी सहायक कृषी अधिकारी रोहित जुमनाके आणि उपकृषी अधिकारी धिरजकुमार देठे यांनी मार्गदर्शन केले. पावसाचे प्रमाण कमी झाल्यास संरक्षित सिंचनाच्या माध्यमातून पिके वाचविण्यासाठी या शेततळ्याचा मोठा फायदा होणार असल्याचे शेतकरी महादेव वडे यांनी सांगितले. तसेच या उपक्रमामुळे शेतीतील उत्पादन व उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘पाणी अडवा, शेती वाचवा’चा संदेश
एल निनोच्या पार्श्वभूमीवर पावसाचे संभाव्य संकट लक्षात घेता शेतकऱ्यांनी आतापासूनच जलसाठ्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. शेततळ्यांच्या माध्यमातून पावसाचे पाणी शेतातच अडवून त्याचा संरक्षित सिंचनासाठी उपयोग केल्यास दुष्काळी परिस्थितीचा सामना करणे शक्य होईल. त्यामुळे या उपक्रमाची प्रेरणा घेऊन इतर शेतकऱ्यांनीही आपल्या शेतात शेततळे उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.