बातमी ऐका (Marathi Voice Reader)
द्राक्ष चांगली होईल या आशेवर कायम द्राक्षाची शेती करायचा, सतत बदलणाऱ्या हवामानामुळे पदरात निराशा आली. लावलेले सगळे पैसे बुडायचे, अखेर शेतकऱ्याने द्राक्षाची बाग उपटून दुसरी पळबाग लावण्याचा निर्णय घेतला. द्राक्षबागेत सतत बसणारा निसर्गाचा फटका आणि अतोनात नुकसान… अशा वेळी खचून न जाता शेतीत काहीतरी नवीन आणि वेगळे करण्याची हिंमत सोलापूरच्या एका शेतकऱ्याने दाखवली.
पारंपरिक पद्धतीला फाटा देत त्यांनी अवघ्या एका एकरात डाळिंबाची अशी काही झिगझॅग (क्रॉस) लागवड केली की, अवघ्या २० महिन्यांत तब्बल ४२ लाखांचे विक्रमी उत्पन्न मिळवून त्यांनी संपूर्ण गावासमोर नवा आदर्श निर्माण केला. त्याच्या या मेहनतीचं सोलापुरात खूप कौतुक होत आहे. जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील अजनाळे येथील प्रयोगशील शेतकरी साधू किसन कोळवले अशी या यशस्वी शेतकऱ्याची ओळख आहे.
द्राक्षाच्या नुकसानीनंतर डाळिंबाचा नवा प्रयोग
द्राक्षबागेत सतत होणाऱ्या आर्थिक नुकसानीमुळे साधू कोळवले यांनी डाळिंब लागवडीचा मार्ग निवडला. मात्र, नेहमीच्या पद्धतीने झाडे न लावता त्यांनी कमी जागेत जास्त उत्पादन घेण्याचे ठरवले. त्यांनी २४ ऑक्टोबर २०२४ रोजी आपल्या १ एकर शेतात क्रॉस म्हणजेच झिगझॅग (Zig-Zag) पद्धतीने तब्बल १,००० झाडांची लागवड केली. सामान्यतः १ एकरात जेवढी झाडे बसतात, त्यापेक्षा कितीतरी अधिक झाडे या तंत्रज्ञानामुळे बसवणे शक्य झाले.
२ एकर शेती, बांधावरच चेन्नईचा व्यापारी अन् ७ लाखांची कमाई! बीडच्या हांगे बंधूंची ‘सिमला मिरची’ हिट
सेंद्रिय खतांवर भर अन् ५ लाखांचा खर्च
बागेची लागवड केल्यापासून त्यांनी प्रत्येक टप्प्यावर सूक्ष्म नियोजन केलं. सेंद्रिय खतांवर अधिक भर दिला, बाजारातील महागडी आणि भेसळयुक्त खते खरेदी करण्याऐवजी एका अॅग्रो तंत्रज्ञाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी स्वतःच्या शेतातच सेंद्रिय खते आणि औषधे तयार केली. रासायनिक आणि सेंद्रिय स्लरीचा अगदी मोजका व संतुलित वापर केल्यामुळे झाडांची वाढ निरोगी झाली. झाडांची लागवड, खते, पाणी आणि औषध फवारणी असा एकूण ५ लाख रुपयांचा खर्च या २० महिन्यांच्या कालावधीत आल्याचं त्यांनी सांगितलं.
काय आहे टेकनिक
साधू कोळवले यांनी सांगितल्यानुसार, झिगझॅग पद्धतीने लागवड केल्यामुळे बागेत अनेक नैसर्गिक फायदे मिळाले. झाडे समोरासमोर न येता क्रॉस आल्यामुळे प्रत्येक झाडाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला. हवा सातत्याने वाहती राहिल्याने रोगांचा आणि कीडीचा प्रादुर्भाव खूप कमी झाला. फवारणी करताना प्रत्येक झाडावर औषध व्यवस्थित पोहोचले, ज्यामुळे औषधांची नासाडी टळली. झाडे मोठी झाल्यानंतरही आंतरमशागत, छाटणी आणि फळांची तोडणी करण्यासाठी बागेत पुरेशी जागा उपलब्ध राहिली.
२० महिन्यांत भरघोस उत्पादन
लागवडीनंतर योग्य निगा राखल्यामुळे झाडांवर डाळिंबाचा दर्जा अतिशय उत्कृष्ट आणि डागविरहित मिळाला. २४ जून २०२६ रोजी त्यांनी आपल्या बागेतील पहिल्याच हंगामाची तोडणी पूर्ण केली. पहिल्याच तोडणीत प्रत्येक झाडाकडून सरासरी १८.५ ते २० किलो फळे मिळाली, ज्यामुळे १ एकरातून तब्बल १८.५ ते २० टन डाळिंबाचे उत्पादन निघाले. बाजारात डाळिंबाचा दर्जा उत्तम असल्याने त्यांना २०० ते २११ रुपये प्रति किलोचा थेट उच्चांकी दर मिळाला.
एकूण ४२ लाखांचे उत्पन्न मिळाले असून, ५ लाखांचा खर्च वजा जाता त्यांना ३७ लाख रुपयांचा निव्वळ नफा या एकाच हंगामात मिळाला आहे. "कमी जागेत त्यांनी आधुनिक पद्धतीचा वापर केला, आणि रासायनिक खतांचा अतिरेक टाळून सेंद्रिय जोड दिली, तर डाळिंबाची शेती आजही सर्वाधिक नफा मिळवून देऊ शकते," असा मोलाचा सल्ला साधू कोळवले यांनी इतर शेतकऱ्यांना दिला आहे.