बातमी ऐका (Marathi Voice Reader)
मुंबई : शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षकांची मोठी भरती आता अंतिम टप्प्यात आली आहे. संगणकीय प्रणालीद्वारे होणाऱ्या या भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता पात्रता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 जानेवारीत घेण्यात आली होती. आता पात्र उमेदवारांसाठी पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया 6 ऑगस्ट 2026 पासून सुरू होत आहे.
27 मे ते 5 जून 2025 या कालावधीत झालेल्या ऑनलाईन चाचणीसाठी एकूण 2 लाख 28 हजार 808 उमेदवारांनी नोंदणी केली होती. यापैकी 2 लाख 11 हजार 308 उमेदवार परीक्षेला बसले. यातून 1 लाख 70 हजार 108 उमेदवार पात्र ठरले आहेत. या गुणांच्या आधारेच इयत्ता 1 ली ते 12 वी साठी शिक्षक भरती होणार आहे.
पवित्र पोर्टलवर जिल्हा परिषद, मनपा, नगरपालिका आणि खाजगी संस्थांकडून आलेल्या मागणीनुसार एकूण 30,209 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.
एकूण पदे
जिल्हा परिषद – 13,351
महानगरपालिका – 1,954
नगरपालिका – 280
आदिवासी विभाग – 2,421
शासकीय विद्यानिकेतन – 56
खाजगी संस्था – 12,148 पदांचा समावेश आहे.
यापैकी 10,328 पदे मुलाखतीशिवाय तर 19,881 पदे मुलाखतीसह भरली जाणार आहेत.
इयत्तानिहाय पदे
सर्वाधिक पदे प्राथमिक विभागासाठी आहेत.
1 ली ते 5 वी – 14,320,
6 वी ते 8 वी – 10,012
9 वी ते 10 वी – 5,513
11 वी ते 12 वी – 364 पदे रिक्त आहेत.
असा करा पसंतीक्रम लॉक
उमेदवारांना https://tait2025.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर लॉगिन करून प्रथम पसंतीक्रम निर्माण करावा लागेल. त्यानंतर 06/08/2026 ते 11/08/2026 या कालावधीत पदनिहाय पसंतीक्रम भरून तो लॉक करणे बंधनकारक आहे. यानंतर मुलाखतीशिवाय पदांसाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. भरतीबाबत तक्रारी किंवा सूचना असल्यास उमेदवारांनी edupavitra25@gmail.com या ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. शासन निर्णयानुसार 80 टक्के पदांसाठी आरक्षणाचे नियम लागू राहतील.