पांढऱ्या पट्टीचा वाद:संदीप देशपांडेंचा थेट सवाल- पांढऱ्या पट्टीने जमीन थंड होते, हे विज्ञान जैन समाजाला इतकी वर्षे माहिती नव्हतं का?

मुंबईतील रस्त्यांवर जैन साधू-साध्वींसाठी मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांच्या वादाने आता अधिकच राजकीय स्वरूप धारण केले आहे. या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा जैन समाजावर आणि या प्रथेला समर्थन देणाऱ्यांवर टीका केली आहे. “पांढऱ्या पट्टीमुळे जमीन थंड राहते, हे विज्ञान जैन समाजाला इतकी वर्षे माहिती नव्हते का? अचानक आता या विज्ञानाचा शोध कसा लागला?” असा सवाल करत त्यांनी या संपूर्ण प्रकारामागे धार्मिकतेच्या नावाखाली सांस्कृतिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. मुंबई आणि उपनगरांमधील काही भागांत जैन साधू-साध्वींना अनवाणी चालताना त्रास होऊ नये म्हणून रस्त्यांवर पांढरे पट्टे रंगवण्यात आले होते. मात्र या प्रकाराला विरोध झाल्यानंतर हा मुद्दा सोशल मीडियापासून राजकारणापर्यंत पोहोचला आहे. पांढऱ्या पट्ट्यांचा वाद नेमका कसा सुरू झाला? गेल्या काही दिवसांत मुंबईतील काही जैन मंदिरे आणि जैन समाजाची वस्ती असलेल्या परिसरांमध्ये रस्त्यांवर पांढरे पट्टे रंगवण्यात आल्याचे दिसून आले. जैन साधू-साध्वी अनवाणी चालत असल्याने उन्हामुळे तापलेल्या रस्त्यांचा त्रास कमी व्हावा, यासाठी हे पट्टे मारण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यांनी यावर आक्षेप घेत सार्वजनिक रस्त्यांवर परवानगीशिवाय अशा प्रकारे रंगकाम करणे योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर हा विषय चर्चेत आला. “मग संपूर्ण रस्ताच पांढरा करा ना” ‘बोल भिडू’ला दिलेल्या मुलाखतीत संदीप देशपांडे यांनी या स्पष्टीकरणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “पांढऱ्या पट्टीमुळे जमीन थंड राहते, असे जर खरे असेल तर मग संपूर्ण रस्ताच पांढरा का करत नाही? हे शक्य आहे का? अचानक आता या विज्ञानाचा शोध कसा लागला? जैन समाजाला हे इतकी वर्षे माहिती नव्हते का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या मते, हा केवळ रस्त्यावर रंग मारण्याचा प्रश्न नसून त्यामागे व्यापक सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ आहेत. ‘धर्माच्या नावाखाली सांस्कृतिक दहशतवाद’ देशपांडे यांनी या मुद्द्यावरून अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. “धर्माच्या किंवा विज्ञानाच्या नावाखाली स्वतःचा सांस्कृतिक दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याला आमचा विरोध आहे,” असे ते म्हणाले. तसेच त्यांनी हा वाद केवळ पांढऱ्या पट्ट्यांपुरता मर्यादित नसल्याचा दावा केला. “मुंबईत मराठी माणूस विरुद्ध इतर असा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. ‘मुंबई आमची’, ‘मराठीत बोलायचे नाही’, ‘हिंदीतच बोला’, ‘या परिसरात मांसाहार नको’ अशा मानसिकतेविरोधात हा लढा आहे,” असे वक्तव्य त्यांनी केले. मनसेच्या भूमिकेनंतर वाद अधिक तीव्र या प्रकरणात मनसेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर काही ठिकाणी मराठी आणि जैन समाजातील नागरिकांमध्ये वादाचे प्रसंगही घडल्याची चर्चा झाली. प्रसाद वेदपाठक यांना धमकीचे फोन आल्याचा दावा झाल्यानंतर त्यांनी मनसेकडे मदत मागितली होती. त्यानंतर मनसेने या मुद्द्यावर उघडपणे भूमिका घेतली. यामुळे हा विषय स्थानिक पातळीवरील वादातून थेट राजकीय चर्चेचा विषय बनला. जैन समाजाकडूनही तीव्र प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांच्या वक्तव्यांनंतर जैन समाजातील काही प्रतिनिधींनीही नाराजी व्यक्त केली आहे. जैन मुनी आणि समाजातील युवा नेतृत्वाकडून मनसेच्या भूमिकेवर आक्षेप घेण्यात आला आहे. जैन समाजाचे युवा नेते कुणाल जैन यांनी देशपांडे यांच्यावर टीका करत, “मराठी आणि जैन समाज अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदाने राहत आहेत. काही राजकीय नेते स्वतःचा अजेंडा पुढे नेण्यासाठी दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करत आहेत,” असे म्हटले. त्यांच्या मते, जैन समाज हा अहिंसा, शांतता आणि सहअस्तित्वावर विश्वास ठेवणारा समाज आहे. एखाद्या स्थानिक मुद्द्यावर चर्चा होऊ शकते, परंतु संपूर्ण समाजाला लक्ष्य करून धार्मिक रंग देणे चुकीचे आहे. “आता जैन समाजातील तरुण गप्प बसणार नाहीत” कुणाल जैन यांनी संदीप देशपांडे यांच्यावर आणखी गंभीर आरोप करत म्हटले की, “देशपांडे वारंवार जैन धर्म, आमचे सण-उत्सव आणि साधू-संत यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरत आहेत. समाजातील वरिष्ठ नेते शांत असतील, पण आता जैन समाजातील तरुण गप्प बसणार नाहीत.” त्यामुळे हा वाद आता केवळ रस्त्यांवरील पांढऱ्या पट्ट्यांपुरता मर्यादित न राहता दोन वेगवेगळ्या भूमिकांमधील संघर्षाचे रूप घेत असल्याचे दिसत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!