जिल्हा बँकेची निवडणूक महायुती एकत्र लढणार:अध्यक्षपदासाठी मंत्री अतुल सावे, विलास भुमरे, समीर सत्तार यांची नावे चर्चेत‎

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना आणि भाजप महायुती करूनच निवडणूक लढण्याचे निश्चित झाले आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडे मुंबईत महायुतीच्या प्रमुखांची बैठक पार पडली. त्यामध्ये एकत्र निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे मनपा आणि जिल्हा परिषदेत स्वतंत्र निवडणुका लढवलेले हे तीनही पक्ष सहकाराची निवडणूक एकमेकांच्या साथीने लढणार आहेत. छत्रपती संभाजीनगरात २१ संचालकांच्या जागासाठी निवडणूक होत आहे. सुरुवातीला शिवसेनेच्या दिग्गज उमेदवारांवर आक्षेप घेण्यात आले होते. त्यामध्ये ४५ अर्ज अवैध ठरवण्यात आले होते. छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेची इमारत. अर्ज ठरले वैध : यामध्ये माजी आमदार अण्णासाहेब माने यांचा अर्ज अवैध ठरला होता, तर आमदार संजना जाधव, सिल्लोडचे नगराध्यक्ष समीर सत्तार, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुवर्णा जाधव यांनी अपील केले होते. त्यांचे अर्ज विभागीय सहनिबंधकांकडे वैध ठरले आहेत. अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून आमदार विलास भुमरे तसेच समीर अब्दुल सत्तार यांची नावे चर्चेत आहेत. याबाबत खासदार संदिपान भुमरे म्हणाले की, महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार आहोत. अध्यक्षपदाचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर उपमुख्यमंत्री घेतील. एकनाथ शिंदे ज्यांचे नाव सुचवतील तेच अंतिम असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपकडून अतुल सावे यांचे नाव चर्चेत आहे. बँकेत चांगले प्रशासक जावेत यासाठी निवडणूक लढवत असल्याचे ते म्हणाले. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक आम्ही एकत्रित लढणार आहोत. जागावाटपाचा निर्णय अंतिम करणार आहोत. लवकरच याचा निर्णय होईल असे ओबीसी विकास मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. महायुती म्हणून आम्ही एकत्र निवडणूक लढवणार आहोत. त्यासाठीचा निर्णय झाला आहे. जागावाटपाबाबत चर्चा सुरू असून अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या दालनात शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये ही बैठक पार पडली. यामध्ये ओबीसी विकास मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, आमदार अब्दुल सत्तार, आमदार सतीश चव्हाण यांच्यासमवेत बैठकीत जागांवर चर्चा झाली आहे. त्यामध्ये महायुती करण्याबाबतचा निर्णय झाला. रविवारी पुन्हा याबाबत बैठक घेऊन जागावाटप अंतिम केले जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिली.

Leave a Comment

error: Content is protected !!