‘बंगालमध्ये एकनाथ शिंदे आणि समृद्धी महामार्ग नव्हता म्हणून…’:तृणमूलमधील फुटीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली असून पक्षाचे बंडखोर खासदार केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर थेट ‘नॅशनल सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया’ (NCPI) या पक्षात विलीन झाले आहेत. हे खासदार आता एनडीएला (NDA) पाठिंबा देणार असल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण घडामोडींवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर अत्यंत तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. ‘गुलामांसारखे दुसऱ्या पक्षात ढकलले’ संजय राऊत यांनी या विलीनीकरणावर सडकून टीका केली. ते म्हणाले, “कधी आपण या पार्टीचे नाव ऐकले आहे का?. नॅशनल सिटीजन ऑफ इंडिया पार्टी ही त्रिपुराची पार्टी आहे. या पार्टीला संपूर्ण त्रिपुरामध्ये फक्त ८६२ मते मिळाली आणि पश्चिम बंगालमध्ये या पक्षाने काही जागा लढवल्या, तिथे त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. त्यांना हजार मतेदेखील पडली नाहीत. अमित शहा आणि शुभेंदू अधिकारी कुठून कुठून या पार्ट्या निर्माण करतात आणि पटलावर आणतात. एखाद्या गुलामाच्या हातापायात बेड्या बांधून कोठडीत ढकलावे, तसे या पक्षात ढकलतात. वीस ते बावीस खासदार भाजपमध्ये जायला निघाले होते, त्यांना एनसीआयपी नावाच्या कुठल्यातरी पक्षात भाजपने विहिरीत ढकलल्यासारखे ढकलून दिले.” विलीनीकरण हाच पक्षांतराचा एकमेव पर्याय राऊत यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची तुलना या घटनेशी केली. ते म्हणाले, “पार्टी मर्ज झाल्यामुळे तृणमूल काँग्रेसवरील त्यांचा दावा आणि चिन्हावरील दावा संपलेला आहे. जे महाराष्ट्रात व्हायला पाहिजे होते, पण इथे एक न्याय वेगळा लागला आहे आणि पश्चिम बंगालमध्ये वेगळी घटना घडली आहे. विलीनीकरण हाच पक्षांतराचा एकमेव पर्याय आहे. महाराष्ट्रातील जो काही स्वतःला शिवसेना म्हणून घेणारा गट आहे, तो पूर्णपणे बेकायदेशीर आहे, असे आम्ही त्यासाठीच म्हणतो. तृणमूलमध्ये ६० पेक्षा जास्त आमदार आणि २० पेक्षा जास्त खासदार फुटलेले आहेत. शिवसेनेत एवढे फुटले नव्हते, तरी त्यांना आपल्या खासदारांना वाचवण्यासाठी एका पक्षात विलीन व्हावे लागले.” ‘समृद्धी महामार्ग आणि एकनाथ शिंदे नव्हते म्हणून…’ शिंदे गटावर पैशांचा वापर केल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला. ते म्हणाले, “महाराष्ट्रात तुलनेत कमी आकडा असतानासुद्धा आजही ते शिवसेना म्हणून मिरवत आहेत, हे दुर्दैव आहे. याचे कारण असे की, महाराष्ट्रातील नेत्यांचा पैशांचा ओघ दिल्लीत जास्त गेला. पश्चिम बंगालमध्ये तुलनेत गरीब राजकारणी असल्यामुळे, तिथे कोणी एकनाथ शिंदे नसल्यामुळे, तिथे समृद्धी महामार्ग निर्माण झाला नसल्यामुळे किंवा त्यांच्याकडे ULC (अर्बन लँड सिलिंग) खाते नसल्यामुळे ते त्या पद्धतीने दिल्लीत, न्यायव्यवस्थेत किंवा निवडणूक आयोगामध्ये पैशाचा ओघ वाहू शकले नाहीत. त्यामुळे त्या गरीब बिचाऱ्यांना कुठल्यातरी पक्षात ढकलून भाजपवाले मोकळे झाले. जर त्यांच्याकडे तेवढे पैसे असते आणि पैशाचा वापर झाला असता, तर तृणमूल पक्ष आणि चिन्हदेखील त्यांना मिळाले असते.” मोहन भागवत आणि पाकिस्तानच्या मुद्द्यावर टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पाकिस्तानशी संवाद कायम राहिला पाहिजे अशी भूमिका मांडली होती, त्यावरही राऊत यांनी प्रहार केला. “मोहन भागवत म्हणतायत किंवा संघ परिवार म्हणतोय त्यांच्याशी चर्चा व्हायला पाहिजे, मग महात्मा गांधींची हत्या का केली या लोकांनी?” असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. पाकिस्तानला चिरडून टाकले पाहिजे ही शिवसेनेची भूमिका असल्याचे ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय दबावाखाली ‘ऑपरेशन सिंदूर’मधून भाजपने जेव्हा माघार घेतली, तेव्हाच ते पाकिस्तानी झाल्याची टीका राऊत यांनी केली. विरोधकांना पंतप्रधानपदाचा चेहरा हवा आगामी लोकसभा निवडणुकांबाबत बोलताना राऊत यांनी स्पष्ट केले की, “उद्धव ठाकरे आणि आमच्या पक्षाला असे वाटते की, आपल्याकडे पंतप्रधानपदाचा एक चेहरा असावा. हा चेहरा घेऊनच आपण लोकसभा निवडणुकीत गेलो तर मोदींना टक्कर देऊ शकू. चेहऱ्याशिवाय निवडणूक कशी लढणार? लोक विचारतील तुमचा उमेदवार कोण, तेव्हा सांगावे लागेल,” असे राऊत यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

error: Content is protected !!