मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करत सरकारला आणि समाजाला महत्त्वाचा संदेश दिला आहे. कोल्हापूर दौऱ्यावर असताना अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी, “राज्यातील एका भागाला आरक्षण आणि दुसऱ्या भागाला नाही, असे माझ्याकडून कधीही होणार नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठ्याला आरक्षण मिळेपर्यंत मी थांबणार नाही,” अशी ठाम भूमिका मांडली. जरांगे पाटील यांच्या या वक्तव्यामुळे मराठा आरक्षणाच्या लढ्याचा पुढील टप्पा काय असणार, याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. गॅझेटच्या आधारे आरक्षणाचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न कोल्हापूरमध्ये बोलताना जरांगे पाटील यांनी विविध संस्थानांच्या गॅझेटचा उल्लेख करत मराठा समाजाच्या मागणीला ऐतिहासिक आधार असल्याचा दावा केला. बॉम्बे संस्थान, सातारा संस्थान, कोल्हापूर, मिरज, औंध आणि पुणे येथील ऐतिहासिक नोंदी व गॅझेटचा संदर्भ देत त्यांनी सरकारने या कागदपत्रांचा विचार करणे आवश्यक असल्याचे सांगितले. “हैदराबाद गॅझेटचा विषय पुढे गेला आहे. आता सातारा संस्थानाच्या गॅझेटबाबत प्रक्रिया सुरू आहे. कोल्हापूरसह इतर भागांतील नोंदींचाही विचार व्हायला हवा. कोणताही विषय एका दिवसात मार्गी लागत नाही. त्यात अनेक अडचणी, संकटे आणि अडथळे येतात. मात्र आपण जिथे पोहोचायचे आहे तिथे नक्की पोहोचू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘गरिबाच्या लेकरासाठी लढतोय’ आरक्षणाच्या लढ्याबाबत बोलताना जरांगे पाटील भावनिकही झाले. “मी या राज्यातील गरीब कुटुंबातील मुलगा आहे. प्रामाणिकपणे मराठा समाजासाठी लढतोय. कोणाच्याही विरोधासाठी नव्हे, तर समाजाच्या हक्कासाठी ही लढाई सुरू आहे,” असे ते म्हणाले. त्याचवेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदर व्यक्त करत, “महाराजांनी हाक द्यावी आणि आम्ही सर्वांनी एकत्र उभे राहावे,” असेही म्हटले. सरकारवर टीका, पण यावेळी काहीसा विश्वासही गेल्या काही वर्षांत सरकारने मराठा समाजाला वारंवार आश्वासने देऊन फसवले, असा आरोप जरांगे पाटील यांनी यापूर्वी अनेकदा केला आहे. मात्र यावेळी त्यांनी सरकारच्या काही निर्णयांचे स्वागतही केले. “यापूर्वी आम्हाला सरकारने फसवलं, हे वास्तव आहे. पण सध्या काही सकारात्मक पावले उचलली जात आहेत. शासन निर्णय काढणे, शिंदे समितीला मुदतवाढ देणे, ५८ नोंदींशी संबंधित प्रमाणपत्रांचे वितरण सुरू ठेवणे, तसेच हैदराबाद गॅझेटच्या आधारे कार्यपद्धती तयार करणे या गोष्टींमुळे काही प्रमाणात विश्वास निर्माण झाला आहे,” असे जरांगे पाटील म्हणाले. तथापि, त्यांनी सरकारला इशाराही दिला. “गॅझेट आणि ऐतिहासिक नोंदींच्या बाबतीत सरकारने योग्य निर्णय घेतला पाहिजे. सरकारला सद्बुद्धी येऊ दे,” असे ते म्हणाले. कोल्हापूर गॅझेटबाबत लवकरच निर्णय? कोल्हापूर दौऱ्यात जरांगे पाटील यांनी छत्रपती घराण्याशी चर्चा करण्याचे संकेत दिले. सातारा संस्थानाच्या गॅझेटचा विषय पुढे सरकत असताना आता कोल्हापूरच्या गॅझेटबाबतही चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. “कोल्हापूरच्या गॅझेटबाबत चर्चा सुरू आहे. महाराजांची भेट घेऊन त्यांचे मत जाणून घेतल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. रोहित पवारांच्या आंदोलनावरही व्यक्त केली भूमिका यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या आंदोलनावरही जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. नुकतीच त्यांनी पंढरपुरात जाऊन रोहित पवार यांची भेट घेतली होती. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी सुरू केलेले उपोषण रोहित पवार यांनी माघारी घेतल्यानंतर या भेटीची चर्चा झाली होती. मराठा आरक्षण लढ्याचा पुढील टप्पा महत्त्वाचा मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारकडून काही सकारात्मक हालचाली होत असल्याचे जरांगे पाटील मान्य करत असले, तरी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळेपर्यंत आंदोलन थांबणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी काळात सातारा, कोल्हापूर आणि इतर संस्थानांच्या गॅझेटमधील नोंदींचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी येण्याची शक्यता असून, मराठा आरक्षणाच्या लढ्याचा पुढील टप्पा राज्याच्या राजकारणासाठीही महत्त्वाचा ठरणार आहे.
